तदनंतर बुद्ध आनंदाला म्हणाला "आनंद, या धर्मपंथाला माझ्या देहावसनानंतर कोणी शास्ता राहिला नाहीं, असें तुम्हांला वाटण्याचा संभव आहे; पण आनंद, माझ्याअभावी मीं जो धर्म आणि विनय तुम्हांला शिकविला आहे, तोच तुमचा शास्ता होय.''

नंतर बुद्ध भिक्षूंनां उद्देशून ह्मणाला "भिक्षुहो, माझ्या धर्ममार्गासंयोगानें ज्याला शंका असेल, त्यानें ती या वेळीं विचारावी.''

पण त्या भिक्षूंमध्ये सर्व सोतापन्नाच्या वरच्या पायरीचेच होते; सोतापन्न झाला नाहीं, असा एक देखील नव्हता. अर्थात् बुद्धाच्या धर्ममार्गाविषयीं कोणाच्याहि मनांत शंका आली नाहीं. तेव्हां बुद्ध ह्मणाला "भिक्षुहो, आतां मी तुम्हांला सांगतों, कीं, सर्व संस्कार व्ययधर्मी आहेत, ह्मणून सावधगिरीनें वागा!''

हेच तथागताचे शेवटले शब्द होत!

नंतर बुद्धगुरु ध्यानस्थ झाला. पहिल्या ध्यानापासून अनुक्रमें नैवसंज्ञानासंज्ञासमाधीपर्यंत सर्व समाधींच्या पायर्‍यांचे उल्लंघन केल्यावर पुन: नैवसंज्ञानासंज्ञासमाधीपासून अनुक्रमें तो पहिल्या ध्यानावर आला, आणि तेथून चवथ्या ध्यानावर येऊन परिनिर्वाण पावता झाला! त्याबरोबर भयंकर भूमिकंप झाला, आणि आकाशांत देवांच्या दुंदुभि फुटून गेल्याचा आवाज झाला! तेव्हां ब्रह्मदेव ह्मणाला "सर्व प्राणी आपला देह टाकून जाणार आहेत. असा हा लोकोत्तर शास्ता सम्यक्-संबुद्ध तथागत श्रद्धादिक बलांनी संपन्न असून देखील परिनिर्वाण पावता झाला!''

अनुरुद्ध म्हणाला "या शांतचित्त मुनीचा आश्वासप्रश्वास देखील कळूं आला नाहीं! मोठ्या धीरानें त्यानें सर्व वेदना सहन केल्या, आणि न डगमगतां तो निर्वाणाला गेला! तेल संपल्यामुळें मशाल जशी आपोआप विझते, तसें याचें चित्त ठायींच्या ठायींच विमुक्त झालें!''

आनंद म्हणाला "सर्वगुणसंपन्न संबुद्धाचें परिनिर्वाण झाल्याबरोबर माझ्या अंगावर कांटा उभा राहिला! मी घाबरून गेलों!''

जे भिक्षु अद्यापि अर्हत्पदाला पोहोंचलें नव्हतें, ते बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर शोकाकुल होऊन गेले; पण जे अर्हत्पदाला पोहोंचले होते त्यांनीं, सर्व संस्कार अनित्य आहेत, त्यांचा कायमचा समागम होणें शक्य नाहीं, असा विचार करून बुद्धाचा वियोग मोठ्या विवेकानें सहन केला.

शोकनिमग्न झालेल्या भिक्षूंनां अनुरुद्ध म्हणाला "बंधुहो, शोक करूं नका, आणि रडूं नका. सर्व प्रियवस्तूंचा आपणाला वियोग होणार आहे, ही गोष्ट भगवंतानें आम्हांला पूर्वीच सांगितली नाहीं काय?''

त्या रात्रीचा अवशिष्ट भाग अनुरुद्धानें आणि आनंदाने भिक्षूंना धर्मोपदेश करण्यांत घालविला.

दुसर्‍या दिवशीं मल्लांनां बुद्धाच्या परिनिर्वाणाची खबर देण्यांत आली. त्यांनी गंधमालादिकांनी बुद्धाच्या शरीराची पूजा करून चक्रवर्ती राजाच्या शरीरासारखा बुद्धाच्या शरीराचा गौरव केला. याप्रमाणें सात दिवसपर्यंत मोठा उत्सव करून कुसिनाराच्या पूर्वेला त्यांनी चंदन काष्ठांची एक मोठी चिता रचली, व बुद्धाचें शरीर नवीन वस्त्रांनी वेष्टून तेलाच्या कढईत टाकिलें, आणि तें त्या चितेवर नेऊन ठेवण्यांत आलें; पण ती चितां कांही पेट घेईना. तेव्हां मल्ल अनुरुद्धाला म्हणाले "भदंत, चिता पेट घेत नाही, याचें कारण काय?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel