तेव्हां त्या लोकांनीं साफ करण्यासाठीं कांही जागा सुमेधाला नेमून दिली.

सुमेधाला नेमून दिलेली सर्व जागा परिशुद्ध झाली होती. परंतु रस्त्यावर एका लहानशा डबक्यामध्यें चिखल सांचला होता. तें डबकें भरून काढण्यांत सुमेधतापस गुंतला असतांच भगवान् दीपंकरबुद्ध त्या ठिकाणीं आपल्या भिक्षुसंघासहवर्तमान उपवनांतून येते झाले. आतां तें डबकें भरून काढण्यास मुळींच अवकाश राहिला नाहीं. तेव्हां सुमेध बुद्धांच्या पायाला चिखल लागूं नये या उद्देशानें त्या डबक्यावर पालथा पडला. इतक्यांत दीपंकर भगवान् त्याच्या डोक्याजवळ येऊन उभे राहिले, आणि आपल्या भिक्षुसंघाकडे वळून म्हणाले “भिक्षु हो! येथे पालथा पडलेल्या या तापसाला तुम्ही पाहत आहां काय? लाखों वर्षांनंतर कपिलवस्तुनगरींत शुद्धोदनराजाच्या मायादेवी नांवाच्या राणीच्या उदरीं जन्म घेऊन मोठ्या प्रयत्नानें बुद्धत्व संपादून हा लक्षावधि लोकांचा उद्धार करणार आहे. मोग्गलान व सारिपुत्त हे दोघे त्याचे अग्रशिष्य होतील, आणि त्याच्या भिक्षुणीसंघांत खेमा व उप्पलवण्णा या दोन भिक्षुणी मुख्य होतील.”

हें बुद्धवाक्य ऐकून तेथें जमलेल्या मनुष्यांनां आणि देवतांनां अत्यंत आनंद झाला.

दीपंकरबुद्ध कांहीं अंतरावर गेल्यावर सुमेधतापस उठून मांडीवर मांडी घालून बसला, व आपणाशींच म्हणाला “भगवान बुद्धांनीं भविष्यत्कालीं मी बुद्ध होणार, असें भविष्य कथन केलें आहे. तथापि बुद्धत्व हें सामान्य मनुष्याला साध्य होण्यासारखें नाहीं. अनेक जन्मांमध्यें लोकहितासाठी परमावधीचा प्रयत्न केला, तरच बुद्धत्व प्राप्त होईल. परंतु आत्मपरहित साधणारे परमोत्कृष्ट असे कोणते गुण असावे बरें?” सूक्ष्म विचाराअंतीं सुमेधपंडिताला सर्वलोकहितकारक असे खालीं दिलेले दहा * गुण आढळले.
-----------------------------------------------------------------------------------------
*  दहा गुणांला पालिग्रंथामध्यें ‘पारमिता’ असे म्हणतात.
----------------------------------------------------------------------------------------
१ दान        ६ क्षांति
२ शील        ७ सत्य
३ नैष्कर्म्य    ८ अधिष्ठान
४ प्रज्ञा        ९ मैत्री
५ वीर्य        १० उपेक्षा


सुमेध म्हणाला “मला जर बुद्धत्व प्राप्त व्हावयाचें आहे, तर मीं या दहा पारमितांचा अभ्यास केला पाहिजे. पण तो एका जन्मांत साध्य होईल काय? नाहीं, अनेक जन्मांच्या अभ्यासानेंच या दहा पारमिता मला साध्य होतील. परंतु इतर लाभापेक्षां बुद्धत्वच मला प्रिय असल्यामुळें यापुढें मी प्रतिजन्मीं पारमितांचाच अभ्यास करीन!”

सुमेधतापसानें ज्या वेळीं बुद्धत्व संपादण्याचा दृढ निश्चय केला, त्या वेळेपासून त्याला बोधिसत्व (भावि बुद्ध) ही संज्ञा प्राप्त झाली. बोधित्सवाच्या अनेक जन्मांतील सत्कृत्यांच्या गोष्टी जातक कथांमध्यें वर्णिल्या आहेत. त्या सर्वांचा येथे उल्लेख देखील करणें शक्य नाहीं. तथापि बोधिसत्वानें दानादि पारमितांचा अभ्यास कसा केला, याचें दिग्दर्शन करण्यासाठीं त्यांपैकीं कांहीं गोष्टी येथें देतों.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel