बुद्ध म्हणाला “भो काश्यप, काल तुझ्या आश्रमांत यज्ञ होणार होता, व त्यासाठीं अंग आणि मगध देशांतील पुष्कळ लोक येणार होते. तेव्हां त्यांना मी कांहीतरी ऋद्धिचमत्कार दाखवून त्यांचें मन वळवीन व त्यायोगें तुझ्या लौकिकाला बाध येईल, असें तुला वाटले; आणि मी त्या समयीं आश्रमांत हजर नसलों, तर बरें होईल, असा विचार तुझ्या मनामध्यें आला; म्हणून मी काल तुझ्या आश्रमांत आलों नाहीं.”

बुद्धाच्या ऋद्धिमत्तेबद्दल काश्यपाची उत्तरोत्तर खात्री होत चालली; परंतु त्याला अद्यापि बुद्धाला अर्हत्पद लाभलें नसावें असें त्याला वाटत होतें.

बुद्धाने आणखीहि कांही ऋद्धीचे चमत्कार काश्यपाला दाखविले, पण बुद्ध अर्हन् झाला अशी त्याची खात्री होईना. एके दिवशी उरुवेलेच्या प्रदेशांत अकालमेघाची भयंकर वृष्टि झाली, व त्यायोगें सर्वत्र पाणीच पाणी होऊन गेलें. काश्यपाला वाटलें, कीं, बुद्ध महापुरांत सांपडून वाहून जाण्याचा संभव आहे. तेव्हां कांही जटिलांसहवर्तमान एका नावेंत बसून तो बुद्ध गुरू रहात होता त्या ठिकाणी गेला. तेथें बुद्ध पाण्याचा प्रवाह आपल्या ऋद्धिबलाने दोन्ही बाजूंला सारून मध्यें कोरड्या जागेंत खुशाल इकडून तिकडे फिरत होता. त्याला पाहून काश्यप मोठ्यानें म्हणाला “तूंच तो महाश्रमण आहेस काय?”

बुद्ध ‘होय’ असें उत्तर देऊन अंतरिक्षांतून त्या नावेंत जाऊन उभा राहिला. तेव्हां काश्यपाच्या मनांत पुन: एकवार पूर्वीचाच विचार उभा राहिला, कीं, “हा महाश्रमण मोठा ऋद्धिमान आहे. पण माझ्यासारखा अर्हत्पदाला पोहोंचलेला नाहीं.”

तेव्हां बुद्ध त्याला म्हणाला “भो काश्यप¡ तूं अर्हन् नाहींस, आणि अर्हत्पदलाभाच्या मार्गाला देखील लागला नाहींस¡”

हे बुद्धाचे शब्द ऐकून काश्यपाचा अभिमान तत्काळ गळाला, आणि तो बुद्धाच्या पायां पडून म्हणाला “भगवन्, मला तुझ्या शिष्यशाखेंत सामील कर.”

बुद्ध म्हणाला “काश्यप, तूं पांचशें जटिलांचा गुरू आहेस. त्यांना भेटल्यावांचून तूं माझा शिष्य होण्याची घाई करूं नको.”

तेव्हां काश्यपानें आपल्या शिष्यांनां एकत्र जमवून बुद्धाचा शिष्य होण्याचा आपला बेत त्यांनां कळिवला. ते सर्व काश्यपाबरोबरच बुद्धाचे शिष्य होण्यास तयार झाले, व त्यांनीं आपल्या जटा कापून अग्निहोत्राच्या साहित्यासहवर्तमान नदीच्या प्रवाहांत टाकल्या. बुद्धानें यांनां आपल्या भिक्षुसंघांत घेतलें.

नदीच्या प्रवाहांतून वहात आलेले ते जटाभार आणि अग्निहोत्राचें तें साहित्य पाहून आपल्या वडील भावावर आणि त्याच्या शिष्यशाखेवर मोठाच प्रसंग गुदरला असावा; असें नदीकाश्यपाला वाटलें, व खरी माहिती मिळविण्यासाठीं आपल्या कांहीं शिष्यांनां त्यानें उरुवेलकाश्यपाच्या आश्रमाला पाठविलें. आपला भाऊ शिष्यशाखेसहवर्तमान बुद्धाचा अनुयायीं झाला, ही बातमी समजतांच नदीकाश्यपहि आपल्या तीनशें शिष्यांसह बुद्धाजवळ जाऊन त्याचा अनुयायी झाला.

त्याचप्रमाणे गयाकाश्यपाच्या कानांवर आपले दोघे बंधु बुद्धानुयायी झाल्याची वार्ता आल्याबरोबर तोहि उरुवेलकाश्यपाच्या आश्रमांत जाऊन आपल्या दोनशें शिष्यांसहवतर्मान बुद्धाचा अनुयायी झाला. याप्रमाणें थोडक्याच अवधींत एक हजार जटिलांनी बुद्धाच्या भिक्षुसंघांत प्रवेश केला.

एके दिवशी बुद्ध या एक हजार भिक्षूंनां म्हणाला “भिक्षुहो¡ जगामध्यें सवर्च वस्तू प्रदीप्त झाल्या आहेत¡ कोणत्या सर्व वस्तू?” पंचिंद्रयें आणि मन या वस्तु प्रदीप्त झाल्या आहेत¡ कशानें प्रदीप्त झाल्या? कामाग्नीनें, क्रोधाग्नीनें आणि मोहाग्नीनें या वस्तु प्रदीप्त झाल्या आहेत; जरा, मरण, शोक, परिदेव, दु:ख, दौर्मनस्य, आणि उपायास यांयोगें प्रदीप्त झाल्या आहेत¡ पण भिक्षुहो¡ जो हें यथार्थत: पाहतो, तो पंचेद्रियें आणि मन यांच्याविषयीं विरक्त होतो;  आणि जो सर्व इंद्रियें आणि त्यांचे विषय यांच्या ठायीं विरक्त होतो, तोच मुक्त समजावा.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel