सेनापतिने त्याच दिवशी राजाला आणि रसकाला त्यांच्या शस्त्रासत्रांसहवर्तमान वाराणसी नगरांतून हांकून दिले. ब्रह्मदत्त एका मोठ्या अरण्यांत शिरला, व तेथें त्यानें एका वडाच्या झाडाखाली रहाण्यासाठी जागा तयार केली. ते वडाचे झाड एवढे मोठे होते की, आपले वसतिस्थान तयार करण्यासाठी खालची जमीन साफसाफू करण्यापलीकडें ब्रह्मदत्ताला विशेष मेहनत करावी लागली नाही.

या झाडापासून कांही अंतरांवर काशी देशांतून इतर देशांत जाणारा रस्ता होता. या रस्त्यानें वाटसरू व व्यापारी लोक प्रवास करीत असत. ब्रह्मदत्तानें एखाद्या झाडाच्या आड दडून बसावें, व त्या मार्गानें पांथस्थ जावयाला लागले, म्हणजे त्यातींल एखाद्या लठ्ठ माणसाला मारून किंवा जीवंत धरून आपल्या वडाकडे चालते व्हावे, व तेथे रसकाने आपल्या धन्याने आणलेली शिकार घेऊन पक्वान्न तयार करून धन्याला द्यावे, असा क्रम चालला होता.

ब्रह्मदत्ताची सगळ्या भरतखंडामध्ये ‘मनुष्यभक्षक चोर’ अशी प्रसिद्धी झाली. त्या मार्गानें जाण्यास वाटसरू व व्यापारी लोक भिऊ लागले. तथापि अरण्यांतून पार जाण्यास दुसरा सोईवार रस्ता नसल्यामुळे निरुपायाने जीवावर उदार होऊन लोक त्याच मार्गानें जात असत.

एके दिवशी रस्त्यात माणसाची शिकार न साधल्यामुळे ब्रह्मदत्तानें आपल्या रसकाला मारून त्याचेचं मांस खाल्ले आणि तेव्हापासून तो एकटाच राहू लागला.

एके दिवशी एक धनाढ्य ब्राह्मण त्या रस्त्याने जात होता. त्यानें आपल्या रक्षणासाठी पुष्कळ पैसे देऊन बरोबर कांही शूर शिपाई घेतले होते. ब्रह्मदत्तानें त्याच्यावर एकदम झ़डप घातली! ‘मी मनुष्य भक्षक चोर आहे,’ असे जेव्हा तो ओरडला, तेव्हा ब्राह्मणाच्या शिपायांचे धाबे दाणाणून ते गर्भगळित झालें. ब्रह्मदत्त ब्राह्मणाला खांद्यावर टाकून आपल्या स्थानाकडे जाऊ लागला. मागाहून ते शूर शिपाई एकमेकांना म्हणूं लागले, की, “काय हो आमचा हा नामर्दपणा! आम्ही मोठमोठ्या लढाया मारलेले मनुष्य त्या एकट्या चोराला पाहून गांगरून गेलो, हे आश्चर्य नव्हे काय! चला आपण त्याचा पाठलाग करूं, आणि ब्राह्मणाला सोडवून आणू.” त्यांनी ब्रह्मदत्ताचा पाठलाग केला. तो त्यांना चुकविण्यासाठी आडवाटेने पळत असता त्याच्या पायांत एक खदिराचा सुळका शिरला. तेव्हा त्यानें ब्राह्मणाला तेथेंच टाकून देऊन आपला जीव कसाबसा वाचविला. शिपायांना ब्राह्मण सापडल्यावर चोराला पकडण्याची इच्छा राहिली नाही. ते ब्राह्मणाला घेऊन माघारे फिरले व आपल्या मार्गाला लागले.

इकडे ब्रह्मदत्त जंगलांतून लंगडतलंगडत आपल्या निवासस्थानाजवळ आला, आणि त्या वडावर राहणार्‍या देवतेला त्याने असा नवस केला की, “जर माझी ही जखम लवकर बरी झाली, तर शंभर राजपुत्रांच्या रक्तानें तुला मी स्नान घालीन आणि मोठा नरयज्ञ करीन.”

सात दिवसपर्यंत अंथरुणावर पडून राहण्याचा प्रसंग आल्यामुळे ब्रह्मदत्ताची जखम आपोआप बरी होत गेली, परंतु आता देवतेच्या ऋणांतून कसें मुक्त व्हावे हे त्याला सुचेना!”

एके दिवशी तो आपल्या शिकारीसाठी निघाला, असता त्याला एक यक्ष भेटला, हा त्याचा पूर्वजन्मीचा सोबती होता, ब्रह्मदत्ताने आपली गोष्ट त्या यक्षाला सांगितल्यावर तो ब्रह्मदत्ताला म्हणाला, “गड्या तूं माझा पूर्वजन्मीचा दोस्त आहेस. तूं माझ्याबरोबर येत असलास तर चल. आपण दोघे एकाच ठिकाणी राहूं.”

ब्रह्मदत्त म्हणाला “मी तुझ्याबरोबर आलो असतो, परंतु माझा एक नवस आहे, तो फेडल्यावाचून मला येथून जाता येत नाही!”
यक्ष म्हणाला “असा तुझा नवस तरी कोणता आहे?”

ब्रह्मदत्तानें घडलेली गोष्ट सांगितल्यावर यक्ष त्याला म्हणाला “शंभर राजकुमारांनां धरून आणण्यासाठी मी तुला मदत केली असती; परंतु जरुरीच्या कामामुळे मला माझ्या निवासस्थाकडे आजच्या आज गेलें पाहिजें. तथापि मी तुला एक मंत्र शिकवितो, त्या मंत्राच्या सामर्थ्यानें वाटेल त्या ठिकाणी वायुवेगानें जाता येईल.”

ब्रह्दत्तानें तो मंत्र चांगला पाठ केला. तेव्हा यक्षानें त्याला आलिंगन देऊन त्याचा निरोप घेतला.

त्या दिवसापासून भरतखंडांवरून राजकुमारांना पकडून आणण्याचा ब्रह्मदत्तानें सपाटा चालविला. दिवसांतून पाचदहा राजकुमारांना त्यानें पकडून आणावे, व त्यांच्या तळहाताला भोके पाडून त्यांत दोरी घालून वडाच्या पारंब्यांना बांधून टाकावें. याप्रमाणें एका आठवड्यातच त्याने शंभर राजकुमार त्या वडाच्या झाडाखाली जमविले. परंतु सुतसोम राजकुमाराला लहानपणांत केलेला उपकार स्मरून पकडून आणलें नाही.

दुसर्‍या दिवशी त्यानें पकडून आणलेल्या राजकुमारांना मारून महायज्ञ करण्याचा बेत केला. तेव्हा त्या वटवृक्षवासी देवतेवर मोठेच संकट आले. ती आपल्या मनाशीच म्हणाली “या चोराच्या पायांत सुळका शिरला, तेव्हा हा काही तरी बडबडत सुटला, कांही तरी नवस करूं लागला, असे मला वाटले होते. याची जखम आपोआप बरी झाली. असे असता आज हा माझ्यासाठी शंभर राजकुमारांना मारून यज्ञ करण्यास सिद्ध झाला आहे! या राजकुमारांच्या हत्येचे पाप माझ्यावर पडूं पहात आहे! पण याला या कर्मापासून निवृत्त करण्याचा मला उपाय सुचत नाही. मी प्रकट होऊन या वृक्षावर राहणारी देवता आहे असे सांगितले, तरी देखील हा माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आतां इंद्रलोकी जाऊन ही गोष्ट इंद्राला कळविली असतां तो कदाचित या चोराला या पापकर्मापासून निवृत्त करूं शकेल.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel