सिद्धार्थाला घोडा तयार आहे, असे समजल्याबरोबर तो आपल्या महालांतून पोषाख करून खाली उतरला, पण इतक्यात त्याला आपल्या पत्नीची आणि त्याच दिवशी जन्मलेल्या पुत्राची आठवण झाली. तो तसाच माघारा फिरला, व यशोधरेच्या महालाकडे गेला. तेथे यशोधरादेवी नाना तऱ्हेच्या पुष्पांनी शृंगारलेल्या राजशय्येवर मुलाला कुशीला घेऊन स्वस्थ निजली होती. सिद्धार्थ तिच्याजवळ गेला. पलंगाजवळील गंधतैलप्रदीपाच्या प्रकाशानें तिचे मुखकमल सहज दिसण्याजोगे होते, पण त्याला तिच्या कुशीला निजलेला आपल्या मुलाचें तोंड स्पष्ट दिसलें नाही. यशोधरेचा हात मुलावर असल्यामुळे त्याला तो दूर सारल्याविना राहुलला पाहता येणे शक्य नव्हतें. तो आपणाशीचच म्हणाला, “माझ्या मुलाला पाहून जावे म्हणून मी येथे आलो, पण जर मी यशोधरेचा हात बाजूला सारला, तर ती जागी होऊन माझ्या जाण्याला भयंकर अडथळा करील!”

सिद्धार्थाच्या मनांतून कितीदा तरी यशोधरेला उठवून तिचा शेवटला निरोप घ्यावा व पुत्रमुख पहावें, असा विचार आला; परंतु आपल्या गमनाला अंतराय होईल, हा विचार प्रबळ होऊन पहिल्या विचाराला ताबडतोब दाबून टाकीत असे. या दोन्ही विचारांचे जणूं काय मल्लयुद्धच चालले होतें. शेवटी यशोधरेला जागी न करताच तेथून निघून जावें, याच विचाराचा जय झाला.

सिद्धार्थ आपणाशीच म्हणाला “मला जर जन्मजरादि दु:खांतून मुक्त होण्याचा मार्ग सापडला, तर माझ्या पुत्राचें आणि स्त्रीचें मला कल्याण करता येईल; परंतु यशोधरेला आतांच जागी करून मी इच्या आणि माझ्या पुत्राच्या मोहांत सापडलो, तर मोक्षमार्गाचा शोध लागण्याची आशा राहिली नाही. पुत्रमुख आणखी कांही वर्षांनी पहाता येण्यासारखे आहे. यशोधरचेहि सांत्वन पुढे कधीतरी करिता येईल; परंतु मोक्षमार्ग शोधून काढण्याची जशी मला आजला संधि आहे, तशी पुढे कधिही येणार नाही. तपश्चर्येचे तीव्र क्लेश सहन करण्यास माझ्या अंगी आज सामर्थ्य आहे, पण हे तारुण्याचे दिवस निघून गेले म्हणजे धर्मसाधनाला लागणारी चिकाटी माझ्या अंगी राहणार नाही. तेव्हा यशोधरेला अशीच निद्रासुखामध्ये सोडून देऊन मी येथून निघून जावें हे बरें. असा विचार करून तो मनांतल्या मनात उद्गारला, “हे यशोधरे! मी तुला नकळत अरण्यवास पत्करीत आहे, म्हणून तुझ्यावर माझे प्रेम नाही असें तूं समजू नकोस. प्राणिमात्राच्या दु;खांने माझे अंत:करण कळवळून जात आहे; मग जिच्या सहवासांत मी इतकी वर्षे घालविली, त्या माझ्या प्रियपत्नीचा मला कळवळा येणार नाही. ही गोष्ट समवेल तरी कशी! माझे आप्तहो! तुम्ही माझ्यावर क्रूरपणाचा आरोप खुशाल आणा. परंतु मी खात्रीनें सांगू शकतो, की, माझे मन पूर्वीपेक्षाहि मृदू झाले आहे. पूर्वी माझ्या दु:खांचीच मला बाधा होत होती, पण आतां सर्व प्राण्यांच्या दु:खांने माझे मन दुखावत आहे. आप्त-इष्ट हे माझ्या सुखासाठी आहेत असे मला वाटत असे, पण आता जगाच्या कल्याणासाठीच जगावें असे मला वाटत आहे.

माझ्यासंबंधानें वाटेल त्याने वाटेल ती कल्पना खुशाल करावी. पण माझा गृहत्याग करण्याचा हेतू केवळ माझ्याच आत्म्याला मोक्ष मिळावा हा नसून अनेक दु:खांनी पीडिलेल्या मनुष्यजातीला सुखावह स्थिति प्राप्त होईल की नाही, याचा मला शोध लावावयाचा आहे, पण या कामी माझ्या आप्तवर्गाकडून मोठे विघ्न येण्याचा संभव असल्यामुळे त्यांचा निरोप घेतल्यावाचून आज मी येथून प्रयाण करीत आहे!”

सिद्धार्थ आपल्या पत्नीच्या महालांतून खाली उतरला, तेव्हा मध्यरात्र होऊन गेली होती. त्या दिवशी आषाढी पौर्णिमा होती. आकाशांत तुरळक मेघ होते. तथापि चंद्रप्रकाशाने सर्व रस्ते साफ दिसत होते. शहरामध्ये जिकडेतिकडे सामसूम झाले होते, जणू काय ते समाधिसुखांत मग्न झाले असावें! मधूनमधून गस्तवाल्यांचे पुकारणे व कोल्ह्या-कुत्र्यांचे ओरडणे एवढेच काय ते ऐंकू येत होते. तथापि त्यामुळे कपिलवस्तूच्या शांतीला कोणत्याही प्रकारें विघ्न झाल्याचे चिन्ह दिसत नव्हते.

सिद्धार्थ कंथकावर स्वार झाला आणि त्यानें छन्नाला आपल्यामागे बसण्यास सांगितले. कंथक इतका बळकट होता की, त्याला त्या दोघांचे ओझे काहीच नव्हते. लगामाला हिसका दिल्याबरोबर तो वायुवेगानें पळत सुटला. त्याच्या टापांनी कपिलवस्तूंतील गाढनिद्रेत मग्न झालेले नागरिक जागे झाले नाहीत यात शंका नाही, परंतु गस्तवाल्यांना देखील या उमद्या घोड्याला थांबविण्याची छाती झाली नाही. तो तडक शहराच्या दरवाज्याशी येऊन उभा राहिला. त्या वेळी दरवाजा बंद होता. पण आश्चर्याची गोष्ट ही की, सिद्धार्थाला आणि छन्नाला घेऊन कंथक तेथे आल्याबरोबर देवतांच्या प्रभावाने दरवाजा आपोआप उघडला व कंथक निघून गेल्यावर तो आपोआप बंद झाला!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel