कांही कालानें राजानें आणि सेनापतींचें वितुष्ट आलें. विडूडभानें त्या संधीचा फायदा घेऊन आपणाला राज्याभिषेक करविला, व वृद्ध बापाला श्रावस्तींतून हांकून दिलें.

मगधदेशांचा राजा अजातशत्रु हा पसेनदीचा भाचा होता. त्याच्या मदतीनें विडूडभापासून राज्य हिसकावून घेण्याचा विचार करून पसेनदि एका दासीबरोबर अज्ञातवेषानें राजगृहाला गेला. पण तेथें पोहोचण्यापूर्वीच राजगृहाबाहेरील एका धर्मशाळेंत मार्गांतील परिश्रमानें तो मरण पावला. अजातशत्रूला आपल्या मामाचा असा दु:खकारक शेवट झाला ही बातमी समजली, तेव्हां त्यानें पसेनदीच्या दज्यार्ला शोभण्यासारखी त्याची उत्तरक्रिया केली.

राज्यकारभार हातीं आल्याबरोबर विडूडभानें शाक्यांवर स्वारी करण्याचा बेत केला. बुद्धानें त्याची समजूत करून त्याचा हा बेत दोन वार रहित करविला; परंतु तिसर्‍यांदां बुद्धाला मध्यस्ती करण्यास सवड न सापडल्यामुळे विडूडभाला आपला बेत नि:शंकपणें पार पाडतां आला. त्यानें शाक्यांवर स्वारी करून त्यांची दाणादाण करून सोडिली. जे शरण आले किंवा पळून गेले, त्यांना सोडून इतरांनां- लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनां-त्यानें कंठस्नान घातलें, व त्यांच्या रक्तानें आपलें आसन धुवावयाला लाविलें. याप्रमाणें शाक्यांचा नि:पात करून विडूडभ श्रावस्तीला आला.

तेथें श्रावस्तीबाहेर अचिरवती (रात्री) नदीच्या वाळवंटांत त्यानें आपल्या सैन्याचा तळ दिला. आसपासच्या प्रदेशांत अकालमेघाची भयंकर वृष्टि होऊन अचिरवतीला महापूर आला, व विडूडभ आणि त्याच्या सैन्यांतील कांही लोक वाहून गेले.

[१६]
उपसंहार


शाक्यांचे राज्य मगधदेशांच्या राज्यापेक्षां लहान होतें. तथापि शाक्यराजे इक्ष्वाकुकुलांतील असल्यामुळें त्यांनां आसपासच्या देशांत फार मानीत असत. शाक्यांनाहि आपल्या कुलाचा मोठा अभिमान वाटत असे. त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीचा असे. या धंद्याला ते फारच महत्त्व देत असत. शुद्धोदन हा शाक्यराजांपैकी एक राजा होता. परंतु त्याला कांहीं काळपर्यंत शाक्यांनी आपला महाराजा केलें होतें असें वाटतें.

सिद्धार्थाचें बाळपण मोठ्या सुखांत गेलें असावें, यांत शंका नाही. तथापि मधुनमधून व्याधि, जरा आणि मरण यासंबंधानें तो विचार करीत असे. याला सुत्तपिटकामध्यें आधार सांपडतो. आपल्या वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी सिद्धार्थानें गृहत्याग केला, व सहासात वर्षे उरुवेलेच्या आसपास घोर तपश्चर्या केली. आपल्या वयाच्या तिसाव्या वर्षी सिद्धार्थ बुद्ध झाला.

प्रथमत: बुद्धानें पांच ब्राह्मणतपस्व्यांनां काशीजवळ ऋषिपतन नांवाच्या उद्यानांत आषाढी पौर्णिमेच्या दिवशी उपदेश केला. हा चातुर्मास संपण्यापूर्वीच बुद्धानें साठ भिक्षु आपल्या संघांत घेतले, व चातुर्मास संपल्यावर त्यांनां धर्मोपदेश करण्यासाठी सर्व दिशांनां पाठविलें. तदनंतर बुद्धाची मोठी कामगिरी म्हटली म्हणजे त्यानें उरुवेलकाश्यप, नदीकाश्यप आणि गयाकाश्यप या तिघां सुप्रसिद्ध जटिल बंधूनां त्यांच्या एक हजार शिष्यांसहवर्तमान आपल्या भिक्षुसंघांत घेतलें ही होय. काश्यपबंधू शिष्य झाल्यामुळें राजगृहांतील श्रमणब्राह्मणांवर बुद्धाचें तेज पडावयाला उशीर लागला नाही. राजगृहामध्यें बुद्धानें पुष्कळ शिष्य मिळविले; परंतु त्या सर्वांत सारिपुत्त आणि मोग्गल्लान हे दोन प्रमुख होत. राजगृहाहून बुद्ध आपल्या भिक्षुसंघासह शुद्धोदनराजाला भेटण्यासाठी कपिलवस्तूला गेला. तेथें घडलेली मुख्य गोष्ट ही, कीं, त्यानें आपल्या पूर्वाश्रमांतील एकुलत्या मुलाला प्रव्रज्या देऊन श्रामणेर केलें.

कपिलवस्तूहून बुद्ध पुन: राजगृहाला आला. तेथें अनाथपिंडिक (सुदत्त) श्रेष्ठीनें त्याची भेट घेऊन त्याला श्रावस्तीला येण्याविषयीं आग्रह केला. पुढें जेव्हां बिंबिसाराला मारून अजातशत्रु सिंहासनावर आला, तेव्हां बुद्धानें आपलें मुख्य ठाणें श्रावस्तीलाच केलें. बुद्धाचे जे अनेक उपदेश त्रिपिटकामध्यें संग्रहित केले आहेत, त्यांतील पुष्कळसे बुद्धानें जेतवनांतील अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात असतां केले. श्रावस्ति हें जरी बुद्धाचें मुख्य ठिकाण झालें होतें, तथापि चातुर्मासखेरीज करून बाकी आठ महिने तो भिक्षुसंघासह धर्मोपदेश करण्यासाठी मध्यदेशांत सर्वत्र फिरत असे.

बुद्धाला विरोध करणारे जे शत्रु उद्भवले, त्यांत देवदत्ताला अग्रस्थान दिलें पाहिजे. देवदत्त शाक्यांपैकींच असून बुद्धाचा जवळचा नातेवाईक होता. तथापि त्यानें जितकें बुद्धाचें वैर केलें, तितकें दुसर्‍या कोणींहि केलें नसेल. उदयनराजाच्या पट्टराणीनेंहि बुद्धाची फजीती करण्याचा प्रयत्न केला. परिवाज्रकांनी बुद्धावर सुंदरीला मारल्याचा आळ घालून श्रावस्तीमध्यें त्याची बेअब्रू करण्याची खटपट केली. परंतु कोणताहि वैरी बुद्धाचें यश मलिन करू शकला नाही. देवदत्तानें आणि इतरांनी बुद्धावर आणिलेले प्रसंग म्हणजे बुद्धाच्या शीलाची एक प्रकारची कसोटीच होती. त्या कसोटीला बुद्ध कसा उतरला, हें मागील कांही प्रकरणांवरून निदर्शनाला आलेंच आहे. सोनें जसे आगींतून तावूनसुलाखून शुद्ध होऊन बाहेर पडतें, तद्वत वरील प्रसंगांनीं बुद्धाचें यश निर्मल होऊन बाहेर पडलें.

यज्ञयागादिकांनां महत्त्व देणार्‍या वैदिक ब्राह्मणांनी बुद्धाचा फार छळ केला, अशी समजूत आहे; पण ती निराधार आहे. बुद्धकाली मध्यदेशांमध्ये यज्ञयागाला फारसें महत्त्व राहिलें नव्हतें. आणि जे कांहीं थोडेबहुत यज्ञ होत असत, त्यांना अतिशय खर्च येत असल्यामुळें ते सामान्य लोकांच्या आटोक्याबाहेरचे होते. बुद्ध चारी वर्णांला समान मानतो, हाच काय तो त्याच्यावर ब्राह्मणांचा मुख्य आरोप होता. तो वाटेल तेथें भिक्षा ग्रहण करितो, चांडाल आणि ब्राह्मण या सर्वांनां आपल्या संघात समानत्वानें वागवितो, व येणेंकरून परंपरागत आलेला वर्णभेद मोडूं पहातो, याबद्दल कित्येक वर्णाभिमानी ब्राह्मणांच्या पोटांत दुखत असे. पण त्यांच्याकडून शिव्याशापांखेरीज बुद्धाचें म्हणण्यासारखें अहित झालें नाहीं. बुद्धाला चांडाल वगैरे शब्दांनी संबोधून त्याच्याशी भांडण करावयाला सिद्ध झालेले कित्येक ब्राह्मण त्याचे शिष्य झाले, हें पुढील भागांतील कांही गोष्टींवरून दिसून येईल.

बुद्धावर आलेलें शेवटलें मोठें संकट म्हटलें म्हणजे विडूडभानें पसेनदीला पदभ्रष्ट करून शाक्यांचा संहार केला हें असावें. बौद्धधर्माचा पहिला पुरस्कर्ता राजा बिंबिसार याला त्याच्या मुलानें ठार मारिलें; दुसरा राजा पसेनदिकोसल याला त्याच्या मुलानें हाकून दिलें. आणि सर्व शाक्यराजांचा नाश केला. पण या ऐहिक संकटांनी बुद्ध डगमगून गेला नाही. त्यानें आपलें धर्मोपदेशाचें काम तहत देहावसानापर्यंत चालविलें होते. त्याच्या उपदेशाचा थोडासा मासला आणि शेवटल्या दिवसांची हकीगत पुढील भागांत दिली आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel