देवदत्त म्हणाला “तर मग जेव्हां या गल्लींतून बुद्ध जाईल, तेव्हां त्याजवर नालगिरि हत्ती सोड.”

“ठीक आहे!” माहुतानें उत्तर दिलें.

नालागिरि हत्ती अत्यंत मस्त होता अशी त्याची ख्याति होती. यदाकदाचित् हस्तिशाळेंतून मोकळा झाला, तर तो माणसांनां ठार मारीत असे. बुद्ध त्या रस्त्यानें जात असतां त्याच्या माहुतानें बंधनें तोडून त्याला मोकळें सोडलें. तेव्हां आसपासच्या घरांतून रहाणारी मनुष्यें कोणी घराच्या छपरावर तर कोणी माडीवर जाऊन दडून बसलीं.

नालागिरि हत्ती बुद्धाच्या अंगावर चालत येत असलेला पाहून भिक्षु म्हणाले “भगवन्, हा मनुष्यघातक भयंकर नालागिरि हत्ती या बाजूनें येत आहे. तेव्हां आपण लवकर दुसर्‍या बाजूला वळावें.”

पण भिक्षुंच्या बोलण्याकडे लक्ष्य न देतां बुद्धगुरू तसाच पुढें निघाला. तेव्हां आजूबाजूच्या लोकांनी “अरेरे! बिचार्‍या या चांगल्या श्रमणाला नालागिरि ठार मारील!” असें दु:खोद्गार काढिले. बुद्धानें आपल्या विश्वमैत्रींचें एकीकरण करून मनोबलानें तिचा प्रवाह त्या हत्तीवर सोडला. नालागिरि सोंड खाली घालून बुद्धाजवळ येऊन उभा राहिला. त्याच्या कुंभस्थळावर हात फिरवून बुद्ध म्हणाला “नागानें नागाला मारणें हें चांगलें नाहीं! कांकी, नागाचा जो घात करतो, त्याला सुगति प्राप्त होत नाहीं. हे कुंजर, तूं मदोन्मत होऊन दुर्गतीला जाऊं नकोस. पण असें कृत्य कर कीं, ज्याच्यायोगें सुगतीला जाशील.”
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(येथे ष्लेष आहे. नाग म्हणजे हत्ती किंवा ज्याला पाप नाहीं असा मनुष्य (न+आग:)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हा उपदेश ऐकून नालागिरीनें शुंडादंडाने बुद्धाची पादधूलि आपल्या मस्तकावर घेतली; आणि पुढले दोन्ही पाय वांकवून बुद्धाला वंदन करून हस्तिशालेंत तो आपल्या ठिकाणावर जाऊन उभा राहिला!

ही गोष्ट घडल्यावर राजगृहांतील आबालवृद्ध ही गाथा गात होते:-

दंडेनेके दमयन्ति अंकुसेहि कसाहि च
अदंण्डेन असत्थेन नागो दंतो महेसिना२।
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(दण्डेंच कोणी शिकवी पशूला,
कोणी कशेला धरि अंकुशाला;
दंण्डादिकांवांचुनि शाक्यसिंहें
आश्चर्य नालागिरि वारिला हें!

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
याप्रमाणे देवदत्ताच्या बुद्धाला मारण्याच्या सर्व मसलती फसल्यावर संघामध्ये फूट पाडण्याची त्यानें एक युक्ति योजिली. तो आपला साथीदार समुद्रदत्त भिक्षु याच्याबरोबर बुद्धाजवळ आला, आणि बुद्धाला वंदन करून म्हणाला “भगवन्, भिक्षुंनी ऐहिक विषयांपासून पूर्णपणें अलिप्त रहाण्यासाठी मीं हे पांच नियम तयार केले आहेत. ते सर्व भिक्षुंनी पाळलेच पाहिजेत अशी आपण आज्ञा करावी. (१) सर्वकाल भिक्षुंनीं अरण्यामध्येंच रहावें; (२) आजन्म भिक्षेवरच निर्वाह करावा, कोणी आमंत्रण केलें असतां त्याच्या घरी भोजनाला जाऊं नये; (३) यावज्जीव रस्त्यांतील चिंध्या गोळा करून त्यांची वस्त्रें तयार करावीं, गृहस्थाकडून वस्त्र घेऊं नये; (४) आजन्म झाडाखालींच रहावें, झोंपडीमध्ये किंवा घरामध्यें राहूं नये; (५) मत्समांसाचें ग्रहण करूं नये. हे पांच नियम पाळण्यांत जो कसूर करील, त्याला दोषी ठरवावें.”

बुद्ध म्हणाला “या पांच नियमांपासून आध्यात्मिक उन्नतीला कांही मदत होईल असें वाटत नाहीं. परंतु ज्याची इच्छा असेल, त्यानें हे पांच नियम खुशाल पाळावे; त्याला काही हरकत नाहीं.”

बुद्ध संघाला हे नियम सक्तीनें लागू करावयाला तयार नाहीं, या गोष्टीचा राजगृहामध्यें जिकडेतिकडे मोठा बभ्रा करून देवदत्तानें आपल्या मताला काहीं भिक्षु मिळविले, व तो त्यांनां घेऊन गयेला चालता झाला. तें वर्तमान ऐकून बुद्धानें सारिपुत्त व मोग्गल्लान यानां त्या भिक्षुंना बोध करून परत आणण्यासाठीं गयेला पाठविलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel