(३) रथहि राजाचें चित्र १ (१ विचित्र) होति जीर्ण,
देह मनुजांचे वृद्ध होति तूर्ण;
सज्जनांच्या धर्मास जरा नाहीं,
साधुसंगति साधूंस हेंच पाही.

(४) नभाहूनी ही भूमि असे दूर,
सगराचाही दूर तसा पार;
असे त्याहुनि तो धर्म सज्जनाचा,
असद्धर्माहुनि फार दूर साचा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(२ मूळ श्लोक (गाथा) येणेप्रमाणें आहेत :--

सकिदेव सुतसोम सब्मि होति समागमो।
सा नं सगति पालेति नासब्भि बहु संगमो।।

सब्भिरेव समासेथ सब्भि कुब्बेथ संथवं।
सतं सद्धम्ममज्जाय सेय्यो होति न पापियो।।

जीरन्ति वे राजरथा सुचिता अयो सरीरं ऽपि जरं उपेति।
सतंच धम्मो न जरं उपेति सन्तो हवे सब्भि पवेदयंति।।

नभं च दुरे पठवी च दूरे पार समुद्दस्स तदाहु दूरे।
ततो हवे दूरतरं वदन्ति सतं च धम्मो सतं च राजा ऽति।।)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे ब्राह्मणाचे श्लोक ऐकून बोधिसत्व फार संतुष्ट झाला व त्याने ब्राह्मणाला एकदम चार हजार कार्षापण बक्षीस दिले. हे वर्तमान कौव्यराजाला समजलें, तेव्हा तो बोधिसत्वावर फारच रागावला. तो म्हणाला “अरे सुतसोम! पांचपन्नास, शंभर कार्षापण एकेका श्लोकाला दिले म्हणजे कमाल झाली. तूं एकदम एका श्लोकाला एक हजार कार्षापण दिले, याला काय म्हणावे?”

सुतसोम म्हणाला “महाराज, विद्येची अभिवृद्धि व्हावी हाच माझा हेतु आहे. साधुसंतांची बोधवचनें ऐकून माझी तृप्ति कधीहि होत नाही. माझ्या दासापासून देखील हितोपदेश ऐकण्यास मी तयार असतो. तेव्हा इतक्या दुरून मुद्दाम आलेल्या ब्राह्मणाला मी विमुख कसा पाठवू? ज्या अर्थी त्याचा उपदेश मी ऐकून घेतला, त्याअर्थी त्याची योग्य बिदागी करणे रास्त होतें, आपण म्हणता त्याप्रमाणें पांच, पन्नास, किंवा शंभर कार्षापण दिले तर ते त्याला वाटखर्चाला देखील पुरावयाचे नाहीत. आता पैशाचा अपव्यय केल्याबद्दल आपण माझ्यावर रागावण्याचे कारण नाही. यापुढे माझ्या हातून असा अपव्यय होणार नाही. मी नरभक्षकाला वचन दिल्याप्रमाणे त्याच्यापाशी जातों. तेथून जीवंत येण्याची आशाच नाही.”

कौरव्यराजा चकित होऊन म्हणाला “हें तूं भलतेंच काय बोलत आहेस! एकदां तूं या दुष्टाच्या हातून सुटून आलास, आणि पुन: त्याच्या तोंडात जाऊन पडतोस, याला काय म्हणावे?”

बोधिसत्व म्हणाला “महाराज! तो जरी अत्यंत क्रूर असला तरी त्यानें माझ्यावर मोठा उपकार केला आहे. ब्राह्मणाच्या ऋणांतून मुक्त होण्यास त्यानें मला संधि दिली, हा त्याचा उपकार मी कसा विसरेन? त्याचा मी विश्वासघात केला असतां माझ्यासारखा नीच आणि कृतघ्न मीच होईन!”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel