दुसर्‍या दिवशीं राजपुरुष राजाच्या मुलाला घेऊन आळवक यक्षाच्या भवनांत आले, आणि त्यांनी त्या मुलाला त्याच्या पुढें केलें. परंतु आळवक लज्जित होऊन खालीं मान घालून चूप बसला. तेव्हां भगवान् म्हणाला, “आळवका, लाजूं नकोस. त्या मुलाला घेऊन माझ्या स्वाधीन कर.” त्याप्रमाणें आळवकानें मुलाला आपल्या हातांत घेऊन भगवंताच्या हातीं दिलें. भगवंतानें पुन्हां आळवकाच्या हातावर ठेविलें, व आळवकानें राजपुरुषांच्या हवालीं केलें. ह्याप्रमाणें एकाच्या हातून दुसर्‍याच्या हातीं गेल्यामुळें त्याला हत्थक (हस्तक) हेंच नांव देण्यांत आलें. १
------------------------------------------------------------------------------------------------------------
१ ‘हस्तक’ ह्या नांवाची व्युत्पत्ति लावण्यासाठीं अट्ठकथाकारानें आळवकाची दंतकथा येथें घेतली आहे, हें स्पष्ट दिसतें. तथापि या दंतकथेचें महत्त्व फार आहे. महाभारतांतील यक्षप्रश्नाचा आणि बकासूरआख्यानाचा हिच्याशीं संबंध आहे. बुद्ध भगवान् आळवकाच्या भवनांत गेला, व आपल्या योगसामर्थ्यानें त्याला त्यानें आपला शिष्य केलें, ही गोष्ट अतिप्राचीन असल्याची साक्ष बौद्ध वाङ्मय व कोरीव कामें देत आहेत. ह्यावरूनच बकासुराची व यक्षप्रश्नाची गोष्ट रचली असावी. आणि बकासुराच्या गोष्टीवरून हस्तकाची गोष्ट रचली असावी.

तो चार संग्रहांनीं लोसंग्रह कसा करीत होता, ह्याची माहिती अंगुत्तरनिकायाच्या अट्ठक निपाताच्या चोविसाव्या सुत्तांत सांपडते. त्या सुत्ताचा सारांश असा :-

एके काळीं भगवान् आळवी येथें अग्गाळव चैत्यांत रहात होता. त्या समयीं हत्थक आळवक पांचशें उपासकांचा समुदाय बरोबर घेऊन भगवंतापाशीं आला, आणि भगवंताला नमस्कार करून एका बाजूला बसला. तेव्हां भगवान् म्हणाला, “हत्थक, हा तुझा समुदाय मोठा दिसतो. ह्या समुदायाचा संग्रह तूं कसा करतोस?”

ह० :- भदन्त, आपण चार लोकसंग्रहांचा २  उपदेश केला आहे. त्यांहींकरून मी ह्या उपासकसमुदायाचा संग्रह करीत असतों. ज्याचा दानानें संग्रह करणें योग्य त्याचा दानानें, ज्याचा प्रियवचनानें करणें योग्य त्याचा प्रियवचनानें, ज्याचा अर्थचर्येंनें (उपयोगी पडण्यानें) करणें योग्य त्याचा अर्थचर्येंनें, व ज्याचा समानात्मतेनें (आपणासारखें वागविण्यानें) करणें योग्य त्याचा समानात्मतेनें मी संग्रह करीत असतों. माझ्या घरीं संपत्ति आहे; दरिद्री असतों तर कदाचित् हें मला शक्य झालें नसतें.”
------------------------------------------------------------------------------------------------------------
२- दान, प्रियवचन, अर्थचर्या आणि समानात्मता हीं चार लोकसंग्रहाचीं साधनें आहेत. त्यांना पालिभाषेत संगहवत्थु म्हणतात. येथें लोकसंग्रह असेंच त्यांचें भाषांतर केलें आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
भ० :- हत्थका, फार चांगलें ! फार चांगलें ! समुदायाचा संग्रह करण्याचा हाच योग्य उपाय आहे. अतीत काळीं, भविष्यत्कालीं व सांप्रत, ज्यांनीं लोकसंग्रह केला असेल, जे करतील किंवा करतात त्या सर्वांनीं ह्याच उपायांनी लोकसंग्रह केला असेल, ते सर्व ह्याच उपायांनीं करतील, व सांप्रत करतात.”

एवढा संवाद झाल्यावर हत्थक भगवंताला नमस्कार व प्रदक्षिणा करून तेथून निघून गेला. तेव्हां भगवान् भिक्षूंना म्हणाला, “भिक्षुहो, हत्थक आळवक, श्रद्धा, शील, र्‍ही (लज्जा), अवत्रप्य (लोकोपवादभय), बहुश्रुतता, त्याग, प्रज्ञा आणि अल्पेच्छता ह्या आठ गुणांनीं युक्त आहे. हे उत्तम आठ गुण हत्थकाच्या अंगीं बसत आहेत असें समजा.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel