बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि

ह्या तीन वचनांनी श्रामणेराला प्रव्रज्या द्यावी.” ह्याप्रमाणे सारिपुत्रानें राहुलकुमाराला प्रव्रज्या दिली.

३४. तेव्हां शुद्धोदन शाक्य भगवंताजवळ येऊन म्हणाला, मी भगवंताजवळ एक वर मागतों.” वृद्ध म्हणाला, “तथागत वर देत नसतात.” शु.- “जो वर योग्य असून अनवद्य आहे तो भगवान् देईल कीं नाहीं?” भ.- “असें असेल तर बोला.” शु.- “भगवंतानें प्रव्रज्या घेतली तेव्हां मला अत्यंत दु:ख झालें. त्यानंतर नंद भिक्षु झाला, त्या वेळीं झालें; व आतां राहुल श्रामणेर झाला तेव्हां तर विचारूं नये. पुत्रप्रेम असे आहे कीं, ते कातडी, मांस, स्नायु व हाडें ह्यांनाहि भेदून जातें. तेव्हां आजपासून आईबापांनीं परवानगी दिल्याशिवाय कोणालाहि श्रामणेर किंवा भिक्षु करण्यांत येऊं नये.” शुद्धोदन शाक्य निघून गेल्यावर बुद्ध म्हणाला, “आजपासून आईबापांनीं परवानगी दिल्यावांचून मुलाला प्रव्रज्या देऊं नये.

३५. कपिलवस्तुहून बुद्ध श्रावस्तीला आला. तेथें बरेच श्रामणेर गोळा झाले होते. आपणास पाळावयाचे नियम कोणते अशी त्यांस शंका आली; तेव्हा खालील दहा नियम पाळण्यास शिकावें अशी भगवंतानें त्यांस परवानगी दिली. (१) प्राणघातापासून विरति. (२) अदत्तादानापासून विरति. (३) अब्रह्मचर्यापासून विरति. (४)असत्य भाषणापासून विरति. (५) सुरापानादिक मादक पदार्थांपासून विरति. (६) विकालभोजनापांसून विरति. (७) ग्राम्य नृत्य गीत वाद्यांपासून विरति (८) पुष्पमाला गंधविलेपन भुषणें इत्यादिकांपासून विरति. (९) उंच आणि उंची शय्येपासून विरति. (१०) सोनें आणि रुपें ग्रहण करण्यापासून विरति. हे श्रमाणेरांनीं पाळण्यायोग्य दहा नियम आहेत. ते पाळण्यास त्यांनी शिकावे.

३६, त्या काळी कांही श्रामणेर भिक्षूंचा आदर ठेवीत नसत. तेव्हां त्यांना दंड करण्याची बुद्धानें परवानगी दिली. तो दंड असा:- त्यांना आपल्या उठण्याबसण्याच्या खोलींतून बाहेर जाण्यास सांगावें. परंतु विहाराच्या आवाराबाहेर घालवून देऊं नये. त्यांना जेवणाखाणाची मनाई करू नये. जो श्रामणेर प्राणघात, चोरी, अब्रह्मचर्य, असत्य भाषण किंवा मद्यपान करील, अथवा बुद्धाची, धर्माची किंवा संघाची निंदा करील, मिथ्यादृष्टि घेऊन बसेल. किंवा भिक्षुणीशीं असभ्य व्यवहार करील, त्याला श्रामणेर ठेवूं नये; संघांतून बाहेर करावे.

उपोसथ

३७. त्या काळीं बुद्ध भगवान् राजगृह येथें गृध्रकूट पर्वतावर राहत होता. तेव्हां बिंबिसार राजा त्याजपाशीं येऊनं वंदन करून एका बाजूला बसला आणि म्हणाला, “भदंत, मी एकटाच असतांना माझ्या मनांत असा विचार आला कीं, दुसर्‍या पंथांतील परिव्राजक चतुर्दशी, पंचदशी, पंचदशी(पौर्णिमा किंवा अमावस्या) आणि अष्टमी ह्या तीन दिवशी एकत्र जमून धर्मोपदेश करीत असतात. लोक धर्मोपदेश ऐकण्यासाठीं त्यांजकडे येतात व त्यांच्यावर प्रसन्न होतात. तेव्हां आपलेहि भिक्षू दर पंधरवड्याला एकत्र जमले असते तर बरें झाले असतें.” बुद्धानें बिंबिसाराला धर्मोपदेश केल्यावर, बुद्धाला नमस्कार करून तो निघून गेला. तेव्हा भिक्षूंना बोलावून बुद्ध म्हणाला, “ भिक्षुहो, दर पंधरवड्यास चतुर्दशी, पंचदशी आणि अष्टमी ह्या तीन दिवशी एकत्र जमण्यास मी तुम्हांस परवानगी देतों.”

३८. त्या काळीं बुद्धानें परवानगी दिली आहे असें म्हणून भिक्षु ह्या तीन दिवशीं एकत्र जमून मुकाट्यानें बसत असत. लोक धर्मोपदेश ऐकण्याच्या उद्देश्यानें त्यांजकडे येत. परंतु ते मुकाट्यानें बसलेले पाहून लोकांना आश्चर्य वाटे, व ते त्यांस दोष लावीत. ही गोष्ट बुद्धाला समजली, तेव्हां तो भिक्षूंना म्हणाला “भिक्षुहो, दर पंधरवड्यांत चतुर्दशी, पंचदशी अष्टमी, ह्या तीन दिवशी एकत्र जमूनो लोकांना धर्मोपदेश करण्यास मी परवानगी देतों.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel