५३. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्याकाळीं षड्वर्गीय भिक्षु उपासकांबरोबर शब्दश: धर्म वचनें म्हणत असत. त्यामुळें उपासकांचा भिक्षूंविषयीं गौरव कमी होऊं लागला. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं; व ती समजली तेव्हां भगवंतानें षड्वर्गियांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षू अनुपसंपन्नांबरोबर१ शब्दश२: धर्म म्हणेल, त्याला पाचित्तिय होतें ।।४।।
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१.अनुसंपन्न ज्याला भिक्षुसंघांत उपसंपदाविधीनें घेण्यांत आलें नाहीं तो पुरुष किंवा मिक्षुणीसंघांत घेण्यांत आलें नाही ती स्त्री.   
२.प्रत्येक शद्ब दुसर्‍याला उच्चारावयास लावून धर्म शिकवील.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५४. बुद्ध भगवान् आळवी येथें अग्गाळव चेतियांत रहात होता. त्या वेळी धर्मश्रवणासाठीं उपासक आरामांत येत असत. धर्मदेशना झाल्यावर स्थाविर भिक्षु आपापल्या विहारांत जात असत. पण नवक भिक्षु तेथेंच उपांसकांबरोबर एकाच उपस्थानशालेंत निजत असत. ते कधीं कधीं नागडे उघडे पडत असत, व त्यामुळें उपासक त्यांवर टीका करीत, हें वर्तमान भगवंताला समजलें तेव्हा त्यानें नियम केला तो असा:- “जो भिक्षु अनुसंपन्नाबरोबर एका ठिकाणीं निजेल, त्याला पाचित्तिय होतें.”

हा नियम घालून देऊन भगवान् आळवीहून कौशांबीला आला व तेथें बदरिकरामांत राहिला. त्या समयीं राहुल श्रामणेर होता. त्याला भिक्षु म्हणाले, “आम्हाला अनुपसंपन्नाबरोबर एका ठिकाणीं निजतां येत नाहीं. तेव्हां तूं आपल्या निजण्याची व्यवस्था पहा. “राहुलाला दुसरी जागा न मिळाल्यामुळें वर्चकुटींत (पायखान्यांत) निजावें लागलें. पहांटेला भगवान् तेथें गेला; व त्याला तेथें राहुल आढळला. आपणांला तेथें कां निजावें लागलें हें राहुलानें त्याला सांगितलें. तेव्हां भिक्षूंला बोलावून भगवान् म्हणाला, “भिक्षुहो, अनुपसंपन्नाबरोबर दोन तीन रात्री एकत्र निजण्यांस मी परवानगी देतो.” आणि त्यानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु अनुपसंपन्नाबरोबर दोन तीन रात्रींपेक्षां जास्ती रात्री एका ठिकाणीं निजेल त्याला पाचित्तिय होतें ।।५।।

५५. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं आयुष्मान अनुरुद्ध कोसल देशांत प्रवास करीत श्रावस्तीला जात असतां एका गांवांत आला. तेथें एका स्त्रीचें आवसथागार१ (१- धर्मशाळा)  होतें. अनुरुद्धानें एक रात्र तेथें रहाण्यास जागा मागितली, व ती त्या स्त्रीनें दिली. त्यानंतर तेथें कांहीं पांथस्थ आले. त्यांनाहि त्या आवसथागारांत अनुरुद्धाच्या संमतीनें जागा देण्यांत आली. अनुरुद्धाला पाहिल्याबरोबर त्या स्त्रीचें मन विकृत झालें, व ती त्याला म्हणाली, “भदंत, येथें तुम्हांला फार दाटी होईल. आंतल्या बाजूला तुमची निजण्याची सोय मी करवितें.” त्यावर कांहीं न बोलतां अनुरुद्धानें ही गोष्ट मान्य केली. रात्रीं ती स्त्री सर्व अलंकार घालून अनुरुद्ध निजला होता त्या खोलींत आली; व त्याला म्हणाली, “भदंत, तुम्ही अत्यंत सुरूप आहां, व मीहि तशीच सुरूप आहें. मला आपली बायको करा.” अनुरुद्ध कांहींच बोलला नाहीं, तेव्हां ती पुन्हां म्हणाली, “मला तुम्ही स्वीकारा; एवढेंच नव्हे तर माझी सर्व संपत्तीहि स्वीकारा.” त्यावर अनुरुद्ध कांहीच बोलला नाहीं. तेव्हां साडी टाकून देऊन ती स्त्री अनुरुद्धासमोर इकडून तिकडे फिरूं लागली, उभी राहूं लागली, बसूं लागली, व निजूं लागली; पण अनुरुद्धानें आपल्या इंद्रियांचें दमन करून तिच्याकडे मुळींच लक्ष्य दिलें नाहीं. त्यामुळें ती स्त्री आश्चर्यचकित झाली, व पुन्हां साडी नेसून अनुरुद्धाच्या पायांवर डोकें ठेवून तिनें त्याची माफी मागितली. अनुरुद्धानें तिला क्षमा केली; व दुसर्‍या दिवशी तिला धर्मोपदेश करून तो तेथून श्रावस्तीला आला. तेथें त्यानें ही गोष्ट भिक्षूंना सांगितली. जेव्हां ती भगवंताला समजली; तेव्हां भगवंतानें, त्याचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु स्त्रीबरोबर एका जागीं निजेल त्याला पाचित्तिय होतें ।।६।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel