राजाच्या हत्तीशाळेंत बोधिसत्त्वाचा मान उत्तम प्रकारें राखण्यांत आला होता हें निराळें सांगावयास नकोच. परंतु त्यानें अन्नपाणी ग्रहण करण्याचें अगदींच वर्ज्य केलें. हें वर्तमान राजाला समजलें तेव्हां हस्तिशाळेंत जाऊन तो बोधिसत्त्वाला म्हणाला, ''हे नागराज, अन्नपाणी वर्ज्य करून तूं आपल्या शरीराला ताप देऊं नकोस. येथें सुखानें राहून आमच्या राज्याचें पुष्कळसें हित तुला करितां येईल.''

हत्ती म्हणाला, ''परंतु ती बिचारी अनाथ, आंधळी, एकाकी अरण्यांत काय करील ? चंडोरण पर्वतावर मोठमोठाल्या खुंटांला आदळून तिची गति काय होईल ? राजा म्हणाला, ''ही बाई कोण आहे ?'' ''महाराज, ती माझी आई आहे.'' हत्ती उत्तरला. हें त्या हत्तीचें मातृप्रेम पाहून राजा अत्यंत गहिंवरला आणि म्हणाला, ''माहुतहो, या मातृभक्त गजाला ताबडतोब मुक्त करा व त्याच्या मूळच्या ठिकाणीं नेऊन सोडा.''

त्याप्रमाणें बोधिसत्त्वाला सोडण्यांत आल्यावर त्यानें सोंडेंत पाणी घेऊन तें आपल्या आईच्या पाठीवर शिंपडलें. तेव्हां ती म्हणाली, ''अरे, हा मेघ देखील भलत्याच वेळीं वर्षाव करीत आहे. माझ्यापाठीं संतप्‍त पृष्ठभागावर पाणी शिंपडणार्‍या प्रियपुत्राची मला हा आठवण देत आहे.'' तेव्हां बोधिसत्त्वानें आपण स्वतःच सेवेसाठीं हजर आहे असें सांगून आपल्या आईला अत्यंत मुदित केले. तिनें काशीराजाला मनःपूर्वक आशीर्वाद दिला.

त्या राजानें बोधिसत्त्वाच्या गुणांवर प्रसन्न होऊन तेथील पुष्करणीच्या जवळ एक गाव वसविला आणि त्याला व त्याच्या आईला रोज आहार मिळावा अशी व्यवस्था केली.

आई निवर्तल्यावर बोधिसतत्व करंडक नांवाच्या आश्रमांत राहून तेथील ॠषीची सेवा करूं लागला. राजानें बोधिसत्त्वाची एक पाषाणप्रतिमा करवून तिचा मोठा गौरव केला आणि जंबुद्वीपातींल लोक प्रतिवर्षी त्या ठिकाणीं जाऊन गजोत्सव करूं लागले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel