बोधिसत्त्व म्हणाला, ''तुमच्याबरोबर माझ्या आश्रमांत आलेला राजकुमार आतां या राष्ट्राचा राजा झाला आहे. त्याला भेटण्यासाठीं मी जात आहे. सध्यां मला तांदुळाची गरज नाहीं. पुढें पाहतां येईल.''

पोपटाचा निरोप घेऊन बोधिसत्त्व वाराणसीला गेला. त्या दिवशी राजाच्या उद्यानांत राहून दुसर्‍या दिवशीं स्नान वगैरे करून भिक्षेसाठी नगरांत फिरूं लागला. त्यावेळीं तो दुष्ट राजा हत्तीच्या अंबारींत बसून नगर प्रदक्षिणेला निघाला होता. बोधिसत्त्वाला पाहून त्याचें पित्त खवळलें. तो मनांतल्या मनांत म्हणाला, ''हा पाजी तापस खाऊन खाऊन लठ्ठ होण्यासाठीं मजपाशीं आला आहे. त्याला याच्या दुष्टपणाचें प्रायश्चित्त ताबडतोब दिले पाहिजे नाहीं तर आपण केलेले उपकार लोकांना सांगून तो माझ्याविषयीं त्यांची मनें कलुषित करील.'' आपल्या नोकरांकडे वळून तो म्हणाला, ''सेवक हो, हा दुष्ट तापस माझ्यापासून कांहीं तरी लाभ व्हावा म्हणून माझ्यामागें घिरट्या घालीत आहे; पण या भिकारड्याचें तोंड देखील मी पाहूं इच्छित नाहीं. याला येथून एकदम घेऊन जा, व प्रत्येक चौकांत फटके मारून शहराच्या बाहेर नेऊन याचा शिरच्छेद करा.''

राजाच्या तोंडांतून शब्द बाहेर पडण्याचा अवकाश- त्या सेवकांनी कांहीं एक विचार न करितां बोधिसत्त्वाला आपल्या हातांनीं बांधून प्रत्येक चौकांत फटके मारण्यास सुरुवात केली, पण आश्चर्याची गोष्ट ही कीं, बोधिसत्त्व आई आई म्हणून न ओरडतां संतोष वृत्तीनें खालील गाथा म्हणत असे--

सच्चं किरेवमाहंसु नरा एकच्चिया इध ।
कट्ठं निप्लवितं न त्वेवेकच्चियो नरो ॥
(अर्थ :- कांही शहाणे लोक म्हणत असत कीं, नदींतून लांकडाला तारलेलें चांगलें; पण तशा एखाद्या माणसाला तारणें चांगलें नाहीं. या त्यांच्या म्हणण्याचा प्रत्यय मला आज येत आहे.)

ती ऐकून बोधिसत्त्वाच्या भोंवती गोळा झालेले कांही शहाणे लोक म्हणाले, ''भो तापस, तुझ्या या बोलण्याचें आम्हाला आश्चर्य वाटतें. तुझा आणखी आमच्या राज्याचा कांहीं संबंध आहे काय ?''

बोधिसत्त्वानें राजा तरुणपणीं प्रवाहांत सांपडून वहात जात असतां आपण त्याला कसें वांचविलें इत्यादि वर्तमान त्यांस सांगितलें. दुष्ट कुमार लहानपणीं प्रवाहांत सांपडला होता ही गोष्ट नागरिकांना माहीत होती. तेव्हां तपस्व्याचें बोलणें त्यांना पटलें, व ते परस्परांला म्हणाले, ''अशा तर्‍हेच्या धैर्यशाली मनुष्याला कांहीं एक दोष नसतां आमचा हा मूर्ख राजा मारूं पहात आहे. अशा कृतघ्न राजाचा आश्रय केल्यानें आमच्या राष्ट्राची वृद्धि कशी होईल. याचक्षणी त्याला धरून या तापसाच्या ऐवजीं ठार मारणें योग्य होईल.'' सर्व नागरिक राजाच्या दुर्वर्तनाला कंटाळलेच होते. यावेळीं त्यांचा क्षोभ इतका तीव्रे झाला कीं, त्यांनीं प्रदक्षिणा करणार्‍या आपल्या राजाला अंबारींतून खालीं ओढून रस्त्यांतच त्याचा वध केला, व बोधिसत्त्वाला बंधनमुक्त करून गादीवर बसविलें. त्यानें राज्याची व्यवस्था धर्मन्यायानें लाविलीं. तथापि, दुष्ट राजाच्या अव्यवस्थेमुळें राष्ट्रांत पैशाची फार टंचाई पडली होती. पण बोधिसत्त्वाच्या मित्रांनीं- सर्पानें आणि उंदरानें- आपल्या संग्रहीं असलेलें धन देऊन ती भरून काढिली. त्या दोघांना आणि पोपटाला बोधिसत्त्वानें वाराणसी नगरींत आणून ठेविलें. आपल्याच राजवाड्यांत त्यानें सर्पासाठीं एक सोन्याचें बीळ तयार केलें होतें; उंदिरासाठीं स्पटिकमण्याची गुहा केली होती; व पोपटाला एका सोन्याच्या पिंजर्‍यांत ठेविलें होतें. त्या तीनहि प्राण्यांनीं आजन्म बोधिसत्त्वावरील आपलें प्रेम एक रतीभरही कमी केलें नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel