३९. निवाडा करण्यांत चातुर्यच पाहिजे.

(महासार जातक नं. ९२)

आमचा बोधिसत्त्व एका जन्मीं वाराणसीच्या राजाचा अमात्य झाला होता. एके दिवशीं राजा आपल्या अंतःपुरांतील स्त्रियांसह उद्यानक्रीडेसाठीं गेला होता. तेथें तो व त्याच्या स्त्रिया तलावांत स्नान करण्यास गेल्या. त्या स्त्रियांनीं आपापले अलंकार काढून उपवस्त्रांत बांधून दासींच्या स्वाधीन केले; व त्या तलावांत उतरल्या. त्यांतील एक दासी अलंकार खालीं ठेवून इकडे तिकडे पहात बसली होती. कांहीं वेळानें ती डुलक्या घेऊं लागली. त्या उद्यानांत पुष्कळ वानर रहात असत. त्यांतील एका वानरीनें त्या दासीच्या जवळ असलेलें अलंकारांचें गांठाडें पाहिलें व ती दासी बेसावध आहे असें पाहून मर्कटीला गांठोड्यांत काय आहे हें पाहण्याची फार उत्सुकता झालीं. खालीं उतरून हळूंच गांठोडें सोडून त्यांतील एक बहुमोल मोत्यांचा हार घेऊन ती मर्कटी तेथून पार पळून गेली, व एका वृक्षाच्या वळचणींत तो हार दडवून ठेवून जणूं काय आपणाला कांहीं माहीत नाहीं असें मिष करून तेथेंच बसून राहिली.

इकडे दासी जागी होऊन पहाते तो गांठोडें सोडलेलें व मुक्ताहार चोरीस गेलेला ! आपल्या जिवावरचें संकट आहे असें जाणून तिनें एकच आरडाओरड केली. इतर दासी व राजस्त्रियाहि तेथें जमा झाल्या व तिला त्यांनीं आरडाओरड करण्याचें कारण विचारिलें. तेव्हां भयचकित होऊन ती म्हणाली, ''माझ्या मागोमाग कोणी मनुष्य येऊन या गांठोड्यांतील हार घेऊन पळून गेला. त्याच्यामागें धांवण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें मी ओरडलें.

राजाला हें वर्तमान समजल्याबरोबर त्यानें उद्यानपालांना बोलावून चोराचा पत्ता लावण्यास हुकूम केला. ते इतस्ततः पळत सुटले. एक ग्रामवासी मनुष्य त्या उद्यानाजवळील रस्त्यानें चालला होता. पोलीस धांवत सुटलेले पाहून बिचारा घाबरून गेला, व आडवाटेनें पळूं लागला. पोलिसांनीं त्याला ताबडतोब पकडिलें, व यथेच्छ मार दिला. पोलिसांच्या तावडींतून सुटण्याचा दुसरा मार्ग न दिसल्यामुळें त्यानें मुक्तहार चोरण्याचा गुन्हा कबूल केला, व तो म्हणाला, ''मला या मुक्तहाराची किंमत काय ठाऊक. मी तो नेऊन नगरश्रेष्ठीला दिला.''

पोलिसांनीं चोराला राजासमोर नेलें, व त्यानें तेथेंहि आपला गुन्हा कबूल करून पूर्ववत् हकीकत सांगितली. तेव्हां राजानें नगरश्रेष्ठीला पकडून आणण्याचा हुकूम फर्माविला; व आपल्यासमोर आल्यावर राजा त्याला म्हणाला, ''माझ्या राजवाड्यांतला हार तूं क्षुद्र माणसाकडून घेतलास कसा ?

श्रेष्ठीला राजाच्या या बोलण्याचा अर्थच समजेना. तो घोटाळ्यांत पडला तेव्हां राजानें त्या गांवढळ मनुष्याकडून सर्व गुन्हा पुनः वदविला. श्रेष्ठीला या संकटांतून पार पडण्याची आशा राहिली नाहीं. आपण हार घेतला नाहीं असें म्हणण्यांत कांहीं अर्थ नाहीं, असें वाटून तो म्हणाला, ''महाराज, या माणसापासून मी मुक्तहार घेतला खरा. पण तो आपल्या पुरोहिताच्या स्वाधीन तेव्हांच्या तेव्हांच करण्यांत आला.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel