आजीबाईनें सेरिवा वाण्याला बोलावून आणून एका आसनावर बसावयास सांगितलें, आणि ती त्याला म्हणाली ''आर्य, आमच्या घरांत हें जुनें ताट पडून राहिलें आहे. याचा आम्हाला सध्यां कांही एक उपयोग होत नाहीं. जर ह्याच्या मोबदला माझ्या मुलीसाठीं एकादि मण्याची माळ द्याल, तर मी तें ताट तुम्हास देईन.''

सेरिवा वाण्यानें तें ताट हातांत घेतलें. त्याच्या वजनावरूनच तें सोन्याचें असावें अशी त्याला शंका आली ? आणि कसोटीला लावून पाहिल्यावर त्याची खात्री झाली. पण त्या बाईला कांहीं एक समजूं न देतां तो म्हणाला, ''हें भिकार ताट येथें कशाला आणिलें ! ह्याची किंमत एक पै देखील होणार नाहीं. ह्याच्या मोबदला मण्याची माळ मला कशी देतां येईल ? तुम्हा बायकांना अक्कल कशी ती मुळींच नसते. उगाच मला त्रास दिलात.''

असे उद्‍गार काढून आणि तें ताट तेथेंच जमिनीवर फेंकून देऊन सेरिवा त्या वाड्यांतून चालता झाला. वाटेंत तो आपणाशींच म्हणाला ''त्या ताटाची खरी किंमत म्हटली म्हणजे एक लाख कार्षापण असली पाहिजे आणि माझ्या सगळ्या मालाची किंमत फार झाली तर तीन चार हजार कार्षापण असूं शकेल. तेव्हां माझा सर्व माल देऊन तें ताट मला मिळालें असतें तरीदेखील माझा पुष्कळच फायदा झाला असता परंतु ज्या अर्थी त्या बाईला त्या ताटाची किंमत माहीत नाहीं, त्या अर्थी मण्याची एक माळ तरी कां खर्च करा ! संध्याकाळच्या वेळीं पुनः येऊन अर्धा कार्षापण किंमतीचे कांही मोडके तोडके कांचेचे मणी देऊन मला तें ताट सहज उपटतां येण्यासारखें आहे. आमच्या व्यापारी लोकांचें हेंच तत्व आहे कीं, जेथें अर्ध्या कार्षापणानें काम होत असेल, तेथें पाउण कार्षापण देखील खर्च करूं नये.''

अशा विचारतरंगांत गर्क होऊन सेरिवा त्या गल्लींतून बाहेर पडला. बोधिसत्त्वाच्या हिश्श्याला आलेले सर्व रस्त्यांतून फेरी करून झाल्यावर; तो सेरिवा ज्या गल्ल्यांतून फेरी करून निघाला त्या गल्ल्यांत शिरला. अनुक्रमें तो त्या बाईंच्या वाड्याजवळ आला. तेव्हां तिची नात तिला म्हणाली, ''आजीबाई, हा दुसरा एक वाणी ह्या रस्त्यानें जात आहे. त्याला तें ताट देऊन तो कांही देत असल्यास पाहूं.''

आजीबाई म्हणाली, ''मुली, त्या पहिल्या वाण्यानें आमची निर्भर्त्सना केली तेवढी पुरे नाहीं का झाली ? आता पुनः ह्याच्याकडून फजीती करून घ्यावयाची तुझी इच्छा आहे काय ?''

मुलगी म्हणाली, ''आजीबाई, मुखचर्येवरून हा वाणी पूर्वीच्या वाण्यासारखा कर्कश दिसत नाहीं. आमच्या ताटाची किंमत कवडीची नसली, तरी तो आमच्याशीं सभ्यपणानें वागेल असें मला वाटतें.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel