त्यांनी आम्हाला खेडोपाडी पिटाळले, व खेडेगावातून जिकडे तिकडे चळवळीचा हा नवा धर्म सांगणार्‍या अगणित संदेशवाहकांचा कल्लोळ ऐकू येऊ लागला.  सारा शेतकरीवर्ग हादरून गेला व तो जो या थंड मनोवृत्तीच्या निवांत घरट्यात हातपाय जोडून स्वस्थ बसला होता तेथून तो बाहेर पडू लागला.  या चळवळीकरता आम्ही खेडोपाडी जाऊ लागलो तेव्हा आमच्यावर त्यामुळे झालेला परिणाम वेगळा परंतु तितकाच दूरगामी झाला, कारण आम्हाला उभ्या जन्मात प्रथमच असा जवळून मातीच्या घरात राहणारा शेतकरी मोकळेपणाने पाहायला मिळाला.  त्या शेतकर्‍याच्या मागे सतत लागलेली उपासमारीची छाया आम्हाला दिसली.  हिंदुस्थानचे अर्थशास्त्र ग्रंथावरून किंवा विद्वानांच्या चर्चेवरून आम्हाला जे काय समजले त्यापेक्षा या खेडेगावातल्या फेर्‍यांमुळे ते अधिक समजले.  खेडेगावातून हिंडण्यापूर्वीच नुसत्या भावनेने आम्हाला जो अनुभव आला होता तो या हिंडण्यामुळे पक्का झाला, आणि त्यानंतर पुढे आमची मते कितीही बदलली तरी त्यापुढे असला आमचा पूर्वीचा जीवनक्रम फिरून सुरू करणे, पूर्वीच्या आमच्या मापाने ते मोजणी अशक्य होऊन बसले.

आर्थिक, सामाजिक, किंवा इतर बाबतींत गांधींचे जे विचार होते ते फार कडक होते.  गांधी आपल्या कल्पना, आपले विचार, इतरांना पटण्याकरता विस्तृत विवेचन करून लेख लिहीत असत व त्यांचे विचार या लेखांतून मांडताना केव्हा केव्हा बदलतही असत, परंतु आपले सारे विचार काँग्रेसवर लादण्याची त्यांची खटपट केली नाही.  काही काही विचार मात्र काँग्रेसच्या विचारसरणीत घुसविण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला.  हा प्रयत्न ते जपून करीत होते, कारण त्यांना जनतेला आपल्याबरोबर न्यावयाचे होते.  केव्हा केव्हा ते काँग्रेसच्या फार पुढे निघून जात व असे झाले म्हणजे त्यांना पुन्हा काँग्रेसकडे परतून यावे लागे.  त्यांची मते सर्वस्वी पटली असे फार थोडेच व काहींचा गांधींच्या मूळ मुख्य दृष्टिकोणाशीच मतभेद होता.  परंतु गांधींच्या दृष्टिकोणाचे स्वरूप बेतशीर करून ज्या रूपाने तो काँग्रेसमध्ये येऊ शकला त्या रूपाच्या त्यांच्या मताचा स्वीकार त्या काळच्या परिस्थितीला योग्य म्हणून पुष्कळ लोकांनी केला.  गांधींच्या विचारसरणीतील दोन मूलभूत कल्पनांचा लोकांवर मोघम परंतु खूपच परिणाम झाला.  त्यांचे पहिले म्हणणे हे की, कोणत्याही गोष्टीचे महत्त्व ठरविताना त्यातली मुख्य कसोटी ही की, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कितपत कल्याण होईल व दुसरे म्हणणे असे की, अंतिम साध्य न्याय्य असले तरीसुध्दा त्या साध्याकरिता साधने कोणती वापरावी ते निवडणे तितकेच महत्त्वाचे आहे, वाटेल ती साधने वापरणे चालणार नाही, कारण साधनांचा परिणाम साध्यावर होतो व साध्य त्यामुळे बदलते.

गांधींचा मुख्य विशेष म्हणजे धर्मनिष्ठा.  ते अंतर्बाह्य पुरेपूर हिंदू होते, परंतु त्यांची जी धर्माबद्दलची कल्पना होती तिच्याशी कोणत्याही आंधळ्या श्रध्देने कडवेपणाने पाळावयाच्या धर्ममतांचा किंवा रूढीचा किंवा धर्मविधी कर्मकांडाचा संबंध नव्हता.*  त्यांच्या धर्माचे मूलतत्त्व नीतीवरची त्यांची असलेली दृढ श्रध्दा; ह्या नीतीवरच्या त्यांच्या श्रध्देला ते सत्याचा धर्म, प्रेमाचा धर्म म्हणत.  त्यांच्या मते सत्य व अहिंसा ही एकच आहेत, निदान एकाच तत्त्वाची फार तर दोन रूपे आहेत इतकेच; व म्हणून गांधी हे दोन शब्द समान अर्थाने धरून एकाऐवजी दुसरा सर्रास वापरतात.  हिंदुधर्माचे तात्पर्य, त्या धर्माची प्रवृत्ती आपल्याला समजली आहे असे ते हक्क म्हणून सांगतात व महणून त्यांच्या स्वत:च्या मताने हिंदुधर्म जो काही त्यांनी अर्थ लावून उत्कृष्ट धर्म ठरविला आहे त्या अर्थाविरुध्द काही शास्त्रवचने किंवा आचार असले तर ती वचने, ते आचार प्रक्षिपत आहेत, किंवा अलीकडेच निघाले आहेत असे म्हणून ते असली वचने किंवा आचार मानीत नाहीत. ''जे काही शास्त्राधार किंवा आचार असे असतील की, त्यांतले मर्म मला समजत नाही किंवा त्यांचे नैतिक दृष्ट्या मला समर्थन करता येत नाही त्या शास्त्राधारांचा किंवा आचारविधींचा मी दास होणार नाही.''  असे त्यांनी म्हटले आहे.
----------------------
*  आंतरराष्ट्रीय बंधुभाव संघटना परिषदेत सन १९२८ च्या जानेवारीत गांधी म्हणाले, ''दीर्घकाल अभ्यास करून व फारा दिवसांच्या अनुभवाने मी जे सिध्दान्त ठरविले आहेत ते हे की : (१) सर्व धर्म सत्य आहेत. (२) सर्व धर्मांत काही काही चुका आहेत. (३) माझ्या स्वत:च्या हिंदुधर्माइतकेच जवळजवळ इतर धर्मही मला प्रिय आहेत.  इतर धर्मांबद्दल मला माझ्या स्वत:च्या धर्माइतकाच आदर आहे.  त्यामुळे धर्मांतराची कल्पना अशक्य आहे.  इतरांसाठी प्रार्थना करताना 'देव ! जो प्रकाश तू मला दाखवलास तोच प्रकाश त्यांना दाखीव !' अशी प्रार्थना कधीही करू नये.  प्रार्थना करावी ती ही की, 'त्यांना पूर्णावस्था प्राप्त करून देण्याकरता अवश्य तो सर्व प्रकाश, सर्व सत्य त्यांना दाखीव !'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Star

new comment

Star

hello

Star

+8 cooment

Star

This has too many comments.

Star

Loving this book.

Star

Finally.

Star

+2 bhai

Star

+1 bhai

Star

Great book.

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel

Books related to भारताचा शोध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल