पितृपक्ष सुरु होते. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा प्रकाशने स्वर्गीय किरणसाठी वाडी ठेवली होती. ती गेल्यापासून त्याला तिची आठवण झाली नाही असा एकही दिवस अद्याप झाला नव्हता. तिचा मृत्यू होऊन इतकी वर्षे लोटली होती, तरीही त्याच्या मनातील तिच्याविषयीचे प्रेम अजूनही तसेच होते. अगदी चिरतरुण!

काही क्षणांच्या प्रतीक्षेनंतर त्याने ठेवलेल्या वाडीला कावळ्याचा स्पर्श झाला. आपल्या चोचीत वाडी म्हणून ठेवलेल्या अन्नाचा काही भाग घेऊन तो कावळा भुर्रकन उडाला. त्यामुळे विक्षर आनंदी झाला होता पण प्रकाश मात्र अजूनही असमाधानीच दिसत होता. तितक्यातच अजून एक कावळा तिथे ठेवलेल्या अन्नाचे भक्षण करू लागला. क्षणार्धातच प्रकाशच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्यावेळी त्याची प्रसन्न मुद्रा पाहून अन्न भक्षण करणारा कावळा म्हणजेच त्याची पत्नी किरण होती. हे विक्षरच काय, इतर कोणीही सांगू शकला असता.

ते दोघे जराही आवाज न करता, कावळ्याकडे पाहत होते. ती बेफिकीर होऊन मुक्तपणे अन्नाचे भक्षण करीत होती. जणू त्या अन्नामध्ये प्रकाशचे इतक्या वर्षाचे प्रेमच मिसळले होते. वर्षभरानंतर पुन्हा एकदा आज त्यांची भेट झाली होती. मनसोक्त अन्न भक्षण करून झाल्यावर ती समाधानाने काव-काव करत होती. जणू ती प्रकाशशी संवादच साधत होती. कावळ्याच्या रूपातील किरणला पाहून कधीही भावूक न होणारा प्रकाश आज थोडासा भावूक झाला होता. त्याच्या मनातील किरणच्या आठवणी आज पुन्हा एकदा जशाच्या तशा त्याच्या मनचक्षुसमोर तरळू लागल्या. सर्वप्रथम किरणच्या मृत्युचा दिवस, त्याने तिच्याबरोबर व्यतीत केलेले क्षण, असे एक-एक करत क्षणार्धात त्याला त्याची आणि तिची पहिली भेट आठवली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel