नागऋषींचा पृथ्वीवर मनुष्यरुपात जन्म झाला होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा मनुष्यरुपात जन्म होऊनही त्यांच्या पूर्वजन्माच्या स्मृतींनी त्यांचा ह्या जन्मातही पीछा सोडला नव्हता. मनुष्य जन्मातील त्यांचे नाव 'भद्र' असे होते. भद्र लहानपणापासूनच खूप बुद्धिमान होता आणि तितकाच हट्टीसुद्धा, जसजसा तो मोठा होऊ लागला तसतसा त्याच्या पूर्वजन्मातील स्मृती हळूहळू जागृत होऊ लागल्या. जणू त्या त्याच्या आत्म्यालाच चिकटलेल्या होत्या. ज्यावेळी त्याच्या पूर्वजन्मातील ह्या सर्व स्मृती जागृत होऊ लागल्या, त्यावेळी तो खूप बेचैन झाला होता. त्याने कित्येकदा या सर्व गोष्टी त्याच्या आई-वडिलांना आणि मित्रमंडळीना सांगितल्या होत्या. पण कोणाचाही त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता. त्यानंतरच्या काळात त्याने ह्या सर्व गोष्टी इतरांना सांगणे सोडून देऊन, आपल्या पूर्वजन्माचे रहस्य शोधून काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यावेळी त्याला स्वतःच्या पूर्वजन्माचा आणि पर्यायाने नागांसारख्या जीवांच्या अस्तित्वाचा बोध झाला.

मनुष्यरुपात जन्म झाल्याने भद्रजवळ कोणत्याही अलौकिक शक्ती नव्हत्या. पण तरीही मनुष्यरूपातही त्याला त्याच्या पूर्वजन्मातील स्मृतींच्या आधारे बरेच काही करता येऊ शकते. ह्या गोष्टींवर त्यांचा ठाम विश्वास होता. त्याचा हाच विश्वास त्याच्यात अंतर्ज्ञानाची शक्ती जागृत करण्यास कारणीभूत ठरला. या अंतर्ज्ञानाने त्याला स्वतःच्या पूर्वजन्माचा बोध झाल्यावर भद्रने त्याच्या पूर्वजन्मातील मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या अनंताला आणि त्यांच्या नातवाला म्हणजे प्रकाशला शासन करायचे मनोमन ठरवले होते.

भद्रला म्हणजेच पूर्वजन्मातील नागऋषींना मनुष्यरुपातही त्यांच्याजवळ पूर्वजन्मात असणारे दिव्य ज्ञान त्याच्या स्मृतींच्या आधारे प्राप्त झाल्याने भद्र ह्या जन्मात सुद्धा आपल्या मंत्रशक्तीच्या सामर्थ्यावर नागलोकापर्यंत अगदी सहज पोहोचू शकत होता. नागराजच्या पुत्राने म्हणजे धनंजयने आपल्या पित्याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अनंताची हत्या केल्याचे त्यांना सामजले होते. तरीही  पूर्वजन्मात आपण एक सामर्थ्यवान नाग असूनही आपल्याला नागमणी प्राप्त करता आला नव्हता, ही गोष्ट भद्रला ह्या जन्मातही अस्वस्थ करत होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारे प्रकाशकडून त्याचा दिव्य नागमणी हिरावून, निदान ह्या जन्मात तरी आपण आपल्या पूर्वजन्मातील अपूर्ण इच्छा पूर्ण करायच्या हेच आता त्याचे धेय्य्य होते. उद्देशाने भद्रने त्यासाठी धनंजयकडे सहाय्य मागितले. पण धनंजय मात्र त्याला सहाय्य करण्यास तयार नव्हता. अशाप्रकारे पदरी निराशा आल्याने भद्र हताश होऊन, नागलोकातून पृथ्वीवर परतला. पण 'धनंजयने आपल्याला सहाय्य करण्यासाठी नकार देण्यामागचे नेमके कारण काय असावे?' या गोष्टीचा शोध घेणे त्याच्यासाठी फार महत्वाचे होते. आपल्या पित्याच्या हत्येचा सूड पूर्ण करण्यासाठी अनंताला संपवून स्वतः राजपद स्वीकारल्यावर संपूर्ण नाग प्रजातीच्या उद्धाराकरिता पृथ्वीवर येऊन, तेथील मनुष्याला आपला गुलाम बनविण्याचे स्वप्न बघणाऱ्या महत्वाकांक्षी धनंजयचे प्रकाशच्या एखाद्या प्रवचनामुळे इतके मतपरिवर्तन होऊ शकते, हो गोष्ट जरी इतर नागांसाठी सामान्य असली तरी भद्रचा मात्र या गोष्टीवर विश्वास नव्हता. म्हणूनच त्याने भूतकाळात नागलोकी घडलेल्या प्रत्येक गोष्टींचा आपल्या अंतर्ज्ञानाच्या दिव्य दृष्टीने शोध घेणे सुरु केले.

धनंजयसहित इतर नागांना पृथ्वीवर येण्यापासून रोखण्याकरिता प्रकाश नागलोकी आला होता. तिथे आल्यावर धनंजयने नागलोकातील अधिकाधिक नागांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी एका भव्य सभेचे आयोजन केल्याचे त्याला समजले. नागांना भ्रमित करून त्यांचा वापर आपल्या स्वार्थासाठी करायचा हाच धनंजयचा सभा घेण्यामागचा मूळ उद्देश होता. हे प्रकाशच्या लक्षात आले होते. त्यामुळे आता त्याला काहीही करून धनंजयला तसे करण्यापासून रोखायचे होते. त्यासाठी तो एका सामान्य इच्छाधारी नागाचे रूप धारण करून त्या सभेत सामील झाला. आपल्या सभेमार्फत धनंजयने तिथे उपस्थित  असलेल्या नागांचे मतपरिवर्तन करण्यात यशस्वी होत आहे, ही गोष्ट लक्षात येताच त्याने त्या सभेमध्ये हस्तक्षेप करून त्या सभेचे संपूर्ण स्वरूपच बदलून टाकले, हे सर्व घडवून आणण्यासाठी त्यावेळी प्रथमच आपल्या नागशक्तीचा प्रयोग केला होता. त्यावेळी त्याने धनंजयसहित तिथे उपस्थित असलेल्या सर्व नागांना वशीभूत करून आपल्या संभाषणचातुर्याने त्यांच्यावर आपल्या विचारांची छाप सोडली. पण ही गोष्ट इथेच संपली नव्हती. इतक्या सहजतेने धनंजयचे मतपरिवर्तन होणे शक्य नव्हते. प्रकाशने त्याला वशीभूत केल्यामुळे त्याचे बरेचशे विचार जरी त्याला पटले असले तरी तो इतक्या सहजतेने आपले उद्धिष्ट विसरणार नव्हता. त्यामुळे त्याने जरी प्रकाशला पृथ्वीवर आक्रमण न करण्याचे वचन दिले असले तरी त्याबद्दल त्याने देखील प्रकाशकडून एक वचन घेतले होते, ते वचन म्हणजे त्याने प्रकाशकडून दर दिवशी एका मनुष्याचा बळी मागितला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रकाशनेही धनंजयची ही अपेक्षा पूर्ण करण्याचे त्याला वचन दिले होते.

प्रकाशने धनंजयला दिलेल्या वचनानुसार प्रकाश दररोज अगदी न चुकता, नागलोकात धनंजयकडे एका मनुष्याचा मृतदेह बळी म्हणून पाठवत असे. नागलोकासाठी असणारा एक दिवस म्हणजे पृथ्वीलोकातील जवळपास एक आठवडा इतका कालावधी होता. या सर्व गोष्टी भद्रने आपल्या दिव्यदृष्टीद्वारे जाणून घेतल्या होत्या. परंतु मनुष्यरुपात जन्म झाल्याने भद्रकडे त्याच्या पूर्वजन्मातील कठोर साधनेने प्राप्त झालेले दिव्य ज्ञान सोडले तर फारशा अलौकिक शक्ती नव्हत्या. म्हणूनच त्यांनी तंत्र विद्येच्या सहाय्याने भुत-पिशाच्चचा राजा असलेल्या वेताळाला, आपल्या साधनेद्वारे प्रसन्न करून आपल्या इच्छित कार्यपूर्तीसाठी त्याचे सहाय्य घेण्याचे ठरवले. परंतु त्याच्या दुर्दैवाने ज्या दिवशी वेताळाचे आगमन झाले, त्याच दिवशी प्रकाशला तांत्रिक रूपातील भद्र म्हणजेच पूर्वजन्मातील नागऋषीबद्दल आणि त्यांच्या दृष्ट हेतूबद्दल समजले. त्याचवेळी त्याने भद्रची साधना भंग करून आपल्या शक्ती सामर्थ्याच्या बळावर, वेताळालाही तिथून निघून जाण्यास भाग पाडले. त्यामुळे भद्रची योजना अयशस्वी ठरली होती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel