प्रकाश नागलोकातून परतल्यानंतर जवळपास वीस वर्षानंतरची ही गोष्ट आहे. मध्यरात्र झाली होती. त्यामुळे सर्वत्र शांतता पसरली होती. याच शांततेचा भंग करणारा, कुत्र्यांच्या रडण्याचा आणि भुंकण्याचा आवाज सर्वत्र घुमत होता. त्यातच कुठुन तरी ढोल, ताशे आणि घुंगरांचा आवाज मध्ये-मध्ये ऐकु येत होता. कुत्र्यांच्या अशा विचित्रपणे रडण्यामागे नक्कीच काहीतरी गंभीर कारण असणार ही गोष्ट प्रकाशच्या लक्षात आली होती.

सर्व सामान्य मनुष्याप्रमाणे रात्री निद्राधीन होण्याची प्रकाशची सवयच आता मोडली होती. तो फक्त अंथरुणावर पडून होता आणि तसेही कुत्र्यांच्या अशा विचित्र आवाजामुळे रात्रीची शांतता भंग झाली होती आणि त्याच्या मनाचीही. न राहवून तो ताडकन उठला आणि त्याच्या घराच्या खिडकीतुन बाहेर पाहू लागला. इमारतीखाली कुत्रे सोडून बाकी कोणीही नव्हते. परंतु हे दृष्य तर सर्वसामान्य मनुष्यासाठी होते. प्रकाशला तर इमारतीपासून काही अंतरावर भलतेच दृष्य दिसत होते. जे एखाद्या सर्वसामान्य मनुष्याच्या दृष्टीस पडणे शक्यच नव्हते.

काही क्षणातच वेताळाचे आगमन होणार होते. आपल्या सक्षम ज्ञानेंद्रियांमुळे या गोष्टीची चाहुल कुत्र्यांना आधीच लागली होती आणि शेवटी तसेच झाले. क्षणार्धात वेताळाचे आगमन झाले. भुत-प्रेत आणि पिशाच्च यांचा राजा असलेला वेताळ आपल्या सोबत आपली प्रचंड फौज घेऊन आला होता. वेताळाच्या मागून चालणारी ती सर्व भुते एखाद्या मिरवणुकीप्रमाणे चित्र-विचित्र आवाज उत्पन्न करणारी वाद्ये वाजवत, नाचत चालली होती. त्यांचे नृत्य जितके विचित्र होते, त्यापेक्षा त्या वाद्यांचा आवाज खुपच भयावह होता. जस-जशी वेताळाची स्वारी पुढे-पुढे येत होती तस-तसे कुत्र्यांचे भुंकणे अधिकच वाढु लागले. जणु काही ते एकमेकांना वेताळाच्या आगमनाची सूचनाच देत होते.

हा सर्व प्रकार प्रकाशच्या घरापासून खूप दूरवर घडत होता. तरीही प्रकाश तो आपल्या दिव्य दृष्टीने स्पष्टपणे पाहु शकत होता. वेताळ इथे का आला असावा? हे जाणुन घेण्यासाठी प्रकाशही आता खुप उत्सुक झाला होता. घरात असलेला त्याचा पुत्र 'विक्षर' अगदी गाढ झोपी गेल्याचे पाहून तो हळूच घराबाहेर पडला. आणि त्याने घराचा दरवाजा बाहेरच्या दिशेला खेचुन घेऊन, नीट बंद केला. दरवाजा आतुन नीट बंद झाला आहे की नाही? हे तपासून झाल्यावर तो इमारती खाली आला.

वेताळाची स्वारी आता, बरीच पुढे निघून गेली होती. त्यामुळे तो झपाझप पावले टाकत तिथपर्यंत पोहोचला आणि गुपचुपपणे त्याचा पिच्छा करू लागला. काही वेळाने ती स्वारी एके ठिकाणी थांबली. ते ठिकाण स्मशान होते. वेताळाने आपल्या सैन्यापैकी काही निवडक पिशाच्चांसह आपले काही सैन्य त्या स्मशानाबाहेर ठेऊन निवडक भुत पिशाच्चांबरोबर स्मशानात प्रवेश केला.

स्मशानात काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेला व्यक्ती काळ्या रंगाचे आसन करुन तोंडातल्या तोंडात काही मंत्र पुटपुटत होता. त्याच्या बाजूला दुसऱ्या एका पात्रात काळे उडीद ठेवले होते. त्या उडीदांवर त्याने एक पणती ठेवलेली होती. त्या पणतीच्याच उजेडामुळे तिथे काहीसा अंधुक प्रकाश निर्माण झाला होता. त्याने आपल्या अवती-भोवती बरीचशी सुगंधित फुले पसरवून ठेवलेली होती. त्यांचा सुगंध तिथे सर्वत्र दरवळत होता. तोंडातल्या तोंडात मंत्र उच्चारण करुन आपल्या साधनेत मग्न असलेल्या त्या व्यक्तीने अशा प्रकारची वातावरण निर्मिती वेताळाला प्रसन्न करण्यासाठी केली होती ही गोष्ट प्रकाशच्या केव्हाच लक्षात आली होती. तरीही हा सर्व काय प्रकार सुरु आहे? हे जाणुन घेण्याची त्याला फार उत्सुकता लागलेली होती. म्हणुन तो यासर्व प्रकारामध्ये हस्तक्षेप करणार नव्हता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel