नागलोकात, धनंजयने पृथ्वीवर प्रस्थान करण्याची तयारी सुरु केली होती. पृथ्वीवर मोठ्या संख्येने नागांना नेण्याचा त्याचा बेत होता. त्याने घेतलेल्या आधीच्या सभेमुळे नागलोकातील बऱ्याच नागांचे मतपरिवर्तन झाले होते. तरीही सर्व नाग अद्याप त्याच्या बाजूने झाले नव्हते. म्हणून जास्तीत जास्त नागांचे मतपरिवर्तन करून त्यांचे मन आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्याने पुन्हा एका भव्य नागसभेचे आयोजन केले होते.

त्या दिवशीही सभेला मोठ्या संख्येने नागांची उपस्थिती होती. ‘आपला नवीन राजा आपल्या नागप्रजातींच्या वृद्धीसाठी आपल्या हिताचे फार मोठे कार्य करणार आहे.’ अशी चर्चा नागलोकात सर्वत्र पसरली होती. त्यामुळे सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी नागांची उत्सुकता ताणली गेली होती.

सभेसाठी धनंजयने एका भव्य सभामंडपाची निर्मिती केली होती. तिथे लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागांमुळे संपूर्ण सभामंडप भरुन गेले होते. धनंजयने नागलोकातील प्रत्येक जातीच्या नागप्रतिनिधींना राजदरबारात महत्वाची पदे देऊन, त्यांना आपल्या बाजूने वळवले होते. त्याचाच परिणाम म्हणून त्या दिवशी कित्येक नाग आपापसातील मतभेद विसरून मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित होते. अनंताच्या मृत्युनंतर नागलोकात धनंजयने नागांच्या मनात त्याचे वेगळेच चित्र निर्माण केले होते. तसा अनंताही नागांचा प्रिय राजा होता. पण त्याने पृथ्वीवर जाणाऱ्या गुप्तमार्गाची रहस्ये नाग-प्रजेपासून लपवून ठेवली होती. त्यामुळे जरी तो उत्तम शासनकर्ता असला, तरी त्याने मनुष्यप्रजातीच्या हितासाठी नागप्रजातीवर अन्याय केला होता. अनंताची अशा प्रकारची ओळख धनंजयने नागप्रजेमध्ये निर्माण केल्याने, आता नागांच्या हृदयामध्ये त्याच्या जागी धनंजयचे नाव आपोआपच कोरले गेले. त्याने दाखवलेल्या स्वप्नांच्या मोहाला बळी पडून, ते अनंताला आगदी सहज विसरून गेले. आपला नवीन, तरुण-तडफदार, साहसी आणि सामर्थ्यवान राजा धनंजयच आता आपल्या हितासाठी कार्य करून आपला उद्धार करेल असा त्यांना विश्वास वाटू लागला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel