मृत्यू म्हणजे महायात्रा. मृत्यू म्हणजे महानिद्रा. मृत्यूचे महान् काव्य गुरुजींनी निरंतर ओठावर नाचविले... आणि एक दिवस फाटक्या कपडयाप्रमाणें आपलें जीवन सहजतेंने फेकून दिलें. त्यांच्या अखेरच्या मनःस्थितीची द्योतक अशी काहीं शेवटची पत्रें.....

मृत्यू म्हणजे महायात्रा. मृत्यू म्हणजे महानिद्रा. दररोजच्या धडपडीनंतर आपण झोपतो. झोप म्हणजे लघुमरण. सर्व जीवनाच्या धडपडीनंतर, अनेक वर्षाच्या धडपडीनंतर असेच आपण झोपतो. रोजची झोप आठ तासांची. परंतु ही झोप मोठी असते एवढाच फरक.

मरण उपकारक आहे. जीवनाने जे काम होत नाही ते काम मरणाने होते. संभाजी महाराजांच्या जीवनाने मराठयांच्यात फूट पडली, परंतु त्यांच्या महान मरणाने मराठे जोडले गेले. ते मरण म्हणजेच अमृत ठरले. ख्रिस्ताच्या जीवनाने जे झाले नाही ते त्याच्या क्रॉसवरच्या मरणाने झाले. मरणात अनंत जीवन असते.

अमवस्येला आपणास अंधार दिसतो. अमावास्येस चंद्र नाही असे आपणास वाटते, परंतु समुद्राला सर्वात मोठी भरती अमावस्येच्या दिवशीच येत असते. अमावास्या म्हणजे सर्वात मोठी परवणी. अमावस्येला चंद्र-सूर्याची भेट होत असते. चंद्र सूर्याशी एकरूप होऊन जातो. त्याप्रमाणे मरण म्हणजे जीवनाची अमावस्या होय. जीव शिवाशी मिळून जातो. जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होतो. जीव दिसत नाही. कारण विश्वंभरात विलिन झालेला असतो. मरण म्हणजे अनंत जीवनात मिळून जाणे. मरणाची अमावस्या म्हणजे जीवनाची मोठी पूर्णिमा होय.

मरण म्हणजे जगाचा वियोग, परंतु जगदीश्वराशी योग. जिवा शिवाजी लग्न घटिका म्हणजे मरण.

मृत्यु ही प्राणमात्राची आई आहे, या जगद्अंगणात मुले खेळून थकली असे पाहून आयुष्याच्या सायंकाळी ही मृत्युगंगा हळूच येते व आपल्या बाळांना निजवते व पुनः जीवनाचा रस देऊन त्यांना खेळण्यासाठी परत पाठवून देते. अमर जीवनाच्या सागरात नेऊन सोडणारी मृत्युंगंगा पवित्र आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel