खर्‍या  शेतकर्‍याला कमी धान्य पिकावे अशी इच्छा नसते. त्याला पत्रकांनी शिकवण्याची जरूरी नाही, परंतु त्याला गूळ, तेले, कापड, साखर, लोखंडी सामान, रॉकेल, सिमेंट, सारे महाग, याचे भय. तो धान्याऐवजी तंबाखू, भुईमूग, कपाशी पेरतो. वस्तू स्वस्त करा. भांडवलदार करणार नाहीत म्हणून कारखाने राष्ट्राच्या मालकीचे करा. दरवर्षी नफा उरेल, तो पुन्हा नवीन उत्पादनात घाला. ५०० कोटी रुपये दडवलेला काळा नफा बाहेर खेचा. संस्थानिकांची पूंजी, वर्षासने थोडी उद्योगधंद्यासाठी घाला. असे योजनापूर्वक कराल तर बेकारी कमी होईल. मग शेतकरी धान्य अधिक पिकवतील. मुळात हात घातला पाहिजे. काँग्रेस सरकारची ही हिंमत नाही.

गांधीजींच्या जीवनाचा यांना विसर पडला आहे. म्हणतात, गांधीजी गेले आणि सत्याग्रहही गेला. श्री. किशोरलालभाईंनी विचारले, 'मग का रक्तपात हवे आहेत.' अन्याय दूर करण्याचा मार्ग गांधीजींनी तुम्हांला दाखविला. तो दूर सारलात तरी आम्ही दूर सारू इच्छित नाही. काँग्रेसला समाजवादी प्रतिष्ठा वाढवून द्यायची नाही. १९३१ मध्ये धुळयाच्या धर्मशाळेत व्यापार्‍या समोर बोलताना विनोबा म्हणाले, 'गांधीजी आहेत, म्हणून रक्तपात नाहीत, परंतु उद्या हा मोठा बांध दूर झाला व तुम्ही शोषणाचे धोरण बदलले नाहीत तर गरीब लोक तुम्हांला काकडीप्रमाणे खाऊन टाकतील.'

त्या शब्दांची काँग्रेस कार्यकर्त्यास मी नम्रपणे आठवण देऊ इच्छितो. जबाबदार काँग्रेस कार्यकर्ते म्हणत असतात. 'आम्ही तरी राज्य करू नाही तर कम्युनिस्ट तरी राज्य करतील.' मध्ये एक समाजवादी पक्ष सत्याग्रही मार्गाने जाणारा आहे, हे ते विसरतात.

काँग्रेसवर टीका करताना मला आनंद नसतो. वाटे डोळे मिटावे, नवजन्म घेऊन नवा लढा करावयास यावे. परंतु या देहात राहूनही नव-जन्म घेता येतो. माझी ध्येयभूत काँग्रेस माझ्या हृदयात आहे. त्याच ध्येयांची समाजवादी पक्ष पूजा करीत आहे. ती प्रत्यक्षात यावी म्हणून सत्याग्रहाच्या मार्गाने जात आहे.

समाजवादी पक्षाला सहानुभूती द्या. तो खरा नवधर्म. कोणी संस्कृतीच्या गप्पा मारतात. जोवर कोटयवधी संसार उद्ध्वस्त आहेत, तोवर कोठली संस्कृती? संघाचे लोक म्हणतात, समाजवाद पाश्चिमात्य आहे. तो नको. त्यांना पाश्चिमात्य यंत्रे चालतात. आगगाडी, रेडिओ, लाउडस्पीकर, सारे हवे. नवी शस्त्रास्त्रे हवीत.

त्यांना कळत नाही की यंत्रापाठोपाठ समाजवाद येतोच म्हणून कारखाने एकाच्या हाती संपत्ती देतात. तेथे असलेले कामगार मग म्हणतात, 'ही संपत्ती आम्ही निर्मिली, आमचीच आहे.' यंत्रे हवीत तर समाजवादही हवा; नाही तर एक उपाशी, एक तुपाशी, असली विषमता राहील. ती विषमता म्हणजे का संस्कृती? असल्या संस्कृतीला दूर फेका. खरी संस्कृती सर्वांचे संसार सुखी करण्यास उभी राहील. समाजवाद प्रत्यक्षात आणणे म्हणजे संस्कृती. खोटया मृगजळात फसू नका. स्वच्छ विचार करावयाला शिका.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel