असाध्य समजले जाणारे रोग एखाद्या सिद्धपुरुषाने दिलेल्या तीर्थ-अंगाऱ्याने बरे होऊ शकतात का? नास्तिक लोक सहसा या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत; परंतु संत सत्पुरुषांच्या चरित्रात प्रकारच्या अनेक आश्चर्यकारक कथा आपल्याला आढळतात. अपार साधना करून ज्यांनी भगवंताला आपलेसे केले आहे . त्यांनी दिलेल्या तीर्थ-अंगाऱ्यात एक प्रकारची अमोघ शक्ती वास करीत असते. त्यामागे त्यांचा प्रभावी संकल्प असतो. या महापुरुषांनी ईश्वराशी ऐक्य जोडलेले असल्यामुळे त्यांचा संकल्प हा ईश्वरी संकल्पच असतो. कारण त्यांना स्वतःचे वेगळे असे अस्तित्वच राहिलेले नसते ते अंतर्बाह्य त्या ईश्वरी शक्तीशीच एकरूप झालेले असतात व त्यामुळे ते बोलतील ते खरे होते. त्यांनी साधी विभूती दिली तरी इच्छित कार्य पूर्ण होते. मंत्राचे असेच आहे . मंत्रशास्त्रविषयक ग्रंथातून वेगवेगळ्या कार्यसिद्धीसाठी अनेक मंत्र दिलेले असतात ; परंतु त्या पुस्तकात पाहून एका विशिष्ट मंत्राचा जप पूर्ण केला तरी इच्छित फळ प्राप्त होताना दिसत नाही व मग 'मंत्रच खोटा' अश्या शब्दात मंत्राची हेटाळणी केली जाते; परंतु मंत्र हादेखील एखाद्या अधिकारी पुरुषाकडून घ्यावा लागतो . गुरुमुखातून प्राप्त झालेल्या मंत्राचे तेज विशेष असते व तो आपला प्रभाव लवकर पाडतो. या संदर्भात ब्र. भू. प. पू. श्री टेंबेस्वामीमहाराज यांची एक गोष्ट मला आठवते. पूज्य महाराजांकडे एक दिवस एक प्रौढ स्त्री आली. तिला संतती न्हवती . तिने कुठेसे 'संतान गोपाल ' मंत्राविषयी वाचले होते. या मंत्राच्या जपाची विशिष्ट संख्या पूर्ण झाली, की संतती होते असे एका ग्रंथात लिहून ठेवले होते त्याप्रमाणे तिने एक-दोनदा नव्हे तर तीन वेळेला त्या मंत्राची संख्या पूर्ण केली; परंतु तिला संतती काही झाली नाही. त्यामुळे त्या मंत्रावरचा तिचा विश्वासच उडाला व ती स्वामी महाराजांकडे आली . तिने आपली अडचण त्यांच्यापुढे मांडली. तेव्हा क्षणभर ध्यानमग्न होऊन स्वामी म्हणाले," बाई , तुम्ही 'संतान गोपाल' मंत्राचा जप करा म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल." 'संतान गोपाल ' मंत्राचे नाव ऐकताच बाई नाराज झाल्या. कारण त्या मंत्राविषयी त्यांचे मत अगोदरच कलुषित झालेले होते; परंतु संतांची आज्ञाही त्यांच्याने मोडवेना. शेवटी थोड्या नाखुशीने का होईना, त्या त्या बाईने त्या मंत्राचा पुन्हा जप केला आणि आश्चर्य असे,की पुढच्याच वर्षी तिला मुलगा झाला. मंत्र तोच; परंतु स्वामींच्या मुखातून त्याचा उच्चार झाल्यावर तिचे काम झाले. तच संदर्भात हकीकत ऐकण्यासारखी आहे. ती त्यांच्याच शब्दात सांगतो. या माझ्या मित्राचे नाव आहे जयंत श्रोत्री. कल्याणला असतात. ते मला मध्यंतरी म्हणाले,"पाच-सहा वर्षापूर्वी मी एका विलक्षण रोगाने आजारी पडलो. या रोगातून आपण कधीकाळी मुक्त होऊ अशी थोडीदेखील अशा मला वाटत नव्हती. कारण मुंबईतल्या मोठमोठ्या प्रसिध्द डॉक्टरांनी त्या रोगापुढे अक्षरश: हात टेकले. मी ज्या रोगाने आजारी पडलो होतो तो रोग म्हणजे 'अल्सर'. तसे पहिले तर तो अनेकांना होतो; परंतु थोडेफार पथ्य सांभाळले व नियमाने औषध घेतले तर बहुतेकांचा रोग आटोक्यात येतो व ऑपरेशनशिवाय बराही होऊन जातो; परंतु माझी 'केस' थोडी जगावेगळीच होती! कारण त्या विषयातल्या तज्ञ डॉक्टरांनाही तिचे निदान होत नव्हते व त्यामुळे माझी प्रकृती योग्य औषधा अभावी हळुहळू जास्तच बिघडत गेली. रोज जेवण झाल्यावर माझे पोट अतिशय जड होत असे. त्यानंतर पोटात इतक्या तीव्र वेदना सुरु होत, की मला जीव नकोसा वाटे ! कित्येकदा जेवण झाल्यावर वांत्या होत. वांत्यानंतर थोडा आराम वाटे; पण पुढे पुढे वांतीबरोबरच चांगले ओंजळभर रक्तही पडू लागले. आणि ते पाहून मी जगण्याची उरली सुरली आशाही सोडून दिली ! या दुखण्यातून आता आपण वाचणे कदापि शक्य नाही असे मला ठामपणे वाटू लागले. तशाही परीस्थित मी कसातरी कामावर जात होतो. कारण राजाही शिल्लक न्हवती; परंतु रोज रोज रक्त पडल्यामुळे माझ्या अंगात त्राण असे अजिबात राहिले न्हवते. त्यातच कल्याणहून रोज लोकलने मुंबईला जायचे म्हणजे केवढे दिव्य आहे , याची बहुतेकांना कल्पना आहेच. माणसांच्या रेटारेटीत आणि धक्काबुक्कीत कसेबसे डब्यात चढायचे आणि थोडासा आधार पकडून, पायाचे तुकडे पडेपर्यंत उभे राहायचे आणि पुन्हा गर्दीच्या लोंढ्याबरोबर धक्के खात बाहेर पडायचे ! संध्याकाळी याचीच पुनरावृत्ती करीत थकूनभागून घरी परतायचे. ज्यांची प्रकृती ठणठणीत आहे त्यांची गोष्ट निराळी. त्यांना या दिव्यातून सहीसलामत बाहेर पडणे फारसे अवघड नाही; परंतु माझ्यासारख्या दुर्बळ व रोगाने शरीर खिळखिळे झालेल्या माणसाने काय करायचे ? हा जीवघेणा प्रवास करायचा तरी कसा ? मी अगदीच भांबावून गेलो, काय करावे, कुठे जावे , हे मला काहीच कळेना ! डॉक्टरी इलाजांबरोबर गंडे, दोरे ,ताईत हे उपायदेखील सुरु होते; परंतु कशानेही गुण येत न्हवता. आता यातून माझी सुटका कोण करणार ? केवळ मृत्यूच की काय? मृत्युच्या नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर शहारे आले. भरल्या संसारातून उठून मृत्युच्या थंडगार मिठित शिरायला कोण तयार होईल ? परंतु मृत्युशिवाय मला दुसरा काही मार्गच दिसत नव्हता. जगातील सर्व दु:खांवर , यातानांवर , चिंतांवर मृत्यू हे केवढे रामबाण औषध आहे ! सगळी दु:खे इथे ठेवून अलगद निघून जायचे ! या विचारामुळे मृत्यूची कल्पनादेखील मला हळुहळू सुखद वाटू लागली. त्याचवेळी कुणीतरी मला 'ऑपरेशन'चा सल्ला दिला; पण 'एक्स-रे' पाहिल्यावर डॉक्टरांनी माझी 'केस' ऑपरेशनने दुरुस्त होण्यासारखी नाही, असा शेररा दिला. त्यामुळे तोही मार्ग खुंटला. आता काय करायचं ? मी अगदी गांगरून गेलो; परंतु त्याचवेळी मला माझ्या सद्गुरूंची एकाएकी आठवण झाली . एवीतेवी मरायचे आहे , तर निदान त्यांचे अखेरचे दर्शन घेऊन मरावे, असा विचार मी केला व दुसऱ्याच दिवशी कल्याण सोडून मी इंदूरची वाट धरली. लहानपणापासून मी मोठा आस्तिक होतो अशातला भाग नाही; परंतु योगायोगाने भेटलेल्या माझ्या सद्गुरूंविषयी, म्हणजेच ब्रम्हीभूत श्रीकुरुलकर महाराजांविषयी माझ्या मनात अपर आदर, श्रद्धा होती. आपली हि व्यथा एकदा त्यांच्या कानावर घालावी , असे मला राहून राहून वाटत होते व म्हणूनच मी इतक्या दूर निघालो होतो. क्रमश:
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel