अश्वत्थामा , बली ,बिभीषण,कृप आणि परशुराम यांना आपण चिरंजीव समजतो .
याबाबत पुढील श्लोक प्रसिद्ध आहे :

।। अश्वत्थामा बलीर्व्यासो हनुमांश्च बिभिषण: ।।
।। कृप: परशुरामश्च सप्तैते चिरंजीवन: ।।

कारणांमुळे या सातजणांना चिरंजीव झाली यापैकी अश्वत्थाम्यासंबंधी महाभारतात पुढील हकीगत वाचावयास मिळते -

कौरव- पांडवांचे शास्त्रागुरू जे द्रोणाचार्य यांचा अश्वत्थामा हा एकुलता एक मुलगा . त्याचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी तो घोड्यासारखा आवाज काढून रडू लागला - म्हणून वडिलांनी द्रोणाचार्यांनी - त्याचे नाव 'अश्वत्थामा' असे ठेवले . या अश्वत्थाम्याचा जन्म रुद्राच्या (शंकराच्या ) नवसाने झालेला होता. त्यामुळे तो स्वभावाने फार तापट आणि तिखट होता. वडिलांकडून त्याने शस्त्रविद्येचे पूर्ण शिक्षण घेतले व त्यात तो चांगलाच पारंगतही झाला.

भारतीय उद्धत भीमाने आपल्या गदेचा जबरदस्त प्रहार करून दुर्योधनाला घायाळ केले. दुर्योधन मरणोन्मुख होऊन पडला. त्यावेळी त्याने दूताकरवी अश्वत्थाम्याला बोलावणे पाठविले. अश्वत्थामा त्याच्या भेटीला गेला. त्या वेळी दुर्योधनाने त्याला सेनापतीपद बहाल केले व पांडवांविरुद्ध शर्थीने लढण्यास सांगितले .अश्वत्थाम्याने त्या पदाचा स्वीकार केला व आपल्या छावणीत परत आला . त्या रात्री सततच्या विचारचक्रामुळे अश्वत्थाम्याला क्षणभरही झोप लागली नाही . पांडवांचा नि:पात कसा करत येईल ,हाच एक विचार त्याच्या डोक्यात सतत घोंगावत होता. शेवटी त्याला एक भयानक उपाय सुचला . तो उपाय अत्यंत क्रूर होता . त्या काळच्या युद्धशास्त्राच्या नितीनियामांना पूर्णपणे सोडून होता; परंतु त्याने तो अंमलात आणण्याचे ठरविले व त्याप्रमाणे रात्री सारी पांडवसेना झोपी गेल्यानंतर तो हळूच त्यांच्या शिबिरात शिरला व त्याने गाढ झोपी गेलेल्या अनेक सैनिकांना तलवारीने ठार मारले .

हि भयानक वार्ता ज्यावेळी भीमाला समजली त्यावेळी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली व तो या गोष्टीचा सूड घेण्यासाठी त्वेषाने बाहेर पडला . परंतु अश्वत्थामा हा भिमापेक्षाही अस्त्रविद्येत अधिक श्रेष्ठ असल्याने भीमाचा त्याच्यापुढे टिकाव लागणार नाही हि गोष्ट श्रीकृष्णाने ओळखली व तो अर्जुन व धर्मराज यांना रथात बसवून त्याच्या मदतीस धावला.

त्यावेळी भागीरथीच्या तीरावर अश्वत्थामा मळकट वस्त्रे नेसून ऋषींच्या समवेत बसलेला होता. भीमसेनाने त्यास आव्हान करून धनुष्य सज्ज केले तेवढ्यात श्रीकृष्ण , धर्म व अर्जुनासह तेथे येउन पोचला . त्यांना पाहून द्रोणपूत्र अश्वत्थाम्याने मुठभर गवताच्या कड्या घेऊन त्या 'ब्रम्हशिरस ' मंत्राने अभिमंत्रित केल्या व "आपाण्डवाय" (पांडवांच्या संहारार्थ ) असे म्हणून वर फेकल्या. अश्वत्थाम्याच्या मनातील हा बेत श्रीकृष्णाने अगोदरच ओळखला होता. त्याने गवताच्या कड्या वर फेक्लेया पाहताच श्रीकृष्णाने अर्जुनास खूण केली. त्याबरोबर अर्जुनाने शंकराचे स्मरण करून, "या अस्त्राचे शमन होवो " असे म्हणून अश्वत्थाम्याच्या ,अस्त्रावर "ब्राम्हशीर" नावाचे दुसरे अस्त्र सोडले. त्या दोघांनी सोडलेल्या या भयानक अस्त्रांच्या योगे सर्वत्र आगीचा डोंब उसळला. तेवढ्यात भागवर व्यास व महर्षी नारद त्या ठिकाणी आले व अशी भयानक अस्त्रे सोडून साऱ्या जगात हा:हाकार उडविल्याबद्दल त्यांनी त्या दोघानाही दोष दिला.

त्यावेळी अर्जुन म्हणाला ," या अश्वत्थाम्याने जे संहारास्त्र सोडले केवळ त्याचा प्रतिकार करण्यासाठीच मला दुसरे अस्त्र सोडावे लागले. जगाला पिडा देण्याचा हेतू नव्हता " असे म्हणून अर्जुनाने शताफिने आपले अस्त्र परत घेतले; परंतु अश्वत्थाम्याचे तप:सामर्थ्य अर्जुनापेक्षा अंमळ कमी असल्याने त्याला स्वत: सोडलेले अस्त्र परत घेत येईना. त्यामुळे भयभीत व हताश झालेला अश्वत्थामा भगवान व्यास व नारदांना म्हणाला ," भीमाची भीती वाटूनच मी ते अस्त्र सोडण्यास प्रवृत्त झालो; परंतु आता ते परत घेणे मला जमत नाही आता मी ते पांडवावरून काढून पांडव स्त्रीयांच्या पोटात जे गर्भ असतील त्यांच्यावर सोडतो. "

हि गोष्ट व्यास व श्रीकृष्ण या दोघांनीही मान्य केली. कारण दुसरा इलाजच न्हवता. त्याप्रमाणे ते अस्त्र पांडवांचा पाठलाग सोडून त्यांच्या स्त्रियांच्या दिशेने निघाले. त्या वेळी श्रीकृष्ण चिडून अश्वत्थाम्याला म्हणाले ," आजवर तू अनंत पापे केली आहेस. त्यात या बालहत्येची भर पडत आहे या पापाचे प्रायश्चित तुला असे मिळेल, कि तू अनेक व्याधींनी जर्जर होऊन हजारो वर्षे निर्मनुष्य अश्या जंगलात व डोंगरात भाटकर राहशील."

व्यासांनीही त्याला म्हंटले कि ," तू एक ब्राम्हण असूनही अनेक नीच कर्मे केलीस. त्याचे प्रायश्चित श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे तुला नि:संशय मिळेल. आता आपल्या मस्तकातला मणी मुकाट्याने धर्मराजाला देऊन तू वनात निघून जा ."

अश्वत्थाम्याने त्याप्रमाणे आपल्या मस्तकावरचा देदीप्यमान मणी धर्मराजाच्या स्वाधीन केला व श्रीकृष्ण परमात्म्याचा श्राप भोगण्यासाठी तो निबिड अश्या जंगलात निघून गेला.

या गोष्टीला आज हजारो वर्षे उलटली. विद्वानांनी महाभारताचा काळ ई.स.पू. १९३१ असा निश्चित केला आहे. म्हणजे वरील प्रसंग घडून आज साधारणत: ३९०० वर्षे झाली; परंतु अश्वत्थामा ज्याअर्थी अजूनही कुणाकुणाला दर्शन देतो, त्याअर्थी अजूनही तो शापमुक्त झालेला नाही. शापमुक्त होण्याची वाट पाहत ,अनेक शारीरिक व्याधींनी जर्जर झालेला अश्वत्थामा निर्मनुष्य रानावनातून एकाकी फिरतो आहे. तो केव्हा मुक्त होणार हे एका परमेश्वरालाच ठाऊक !

अश्वत्थाम्याच्या शापाची ही हकीगत महाभारतात दिली आहे म्हणून ती खरी समजावयास हरकत नाही. दुसरे असे , की अश्वत्थामा अजूनही कुणाकुणाला भेटतो. तशा हकिगती वृत्तपत्रातून केव्हा केव्हा प्रसिद्धही होतात.

आमचे वडील अश्वत्थाम्याच्या संदर्भात पुढील एक विलक्षण कथा नेहमी सांगायचे-

'अश्वत्थामा" हा चिरंजीव असून तो बऱ्हाणपूरजवळच्या जंगलात राहतो व भिक्षेसाठी गावात येतो. हि गोष्ट रेल्वेत स्टेशनमास्तरच्या हुद्द्यावर काम करणाऱ्या श्री. जोशी नावाच्या एका गृहस्थांना ठाऊक होती. श्री . जोशी हे मोठे चिकिस्तक गृहस्थ होते. त्यांचे घर बऱ्हाणपूरातच होते अश्वत्थाम्याबाद्दलची हि ऐकीव कथा कितपत सत्य आहे याची शहानिशा करण्याचे त्यांनी ठरविले. एखादी गोष्ट एकदा मनात आल्यानंतर ती प्राप्त होईपर्यंत सोडायचा नाही, अशी त्याची धडपडी वृत्ती होती. त्यामुळे या अश्वत्थाम्याला शोधून काढाय चंग बांधला व त्या दृष्टीने त्यांनी गावातील वृद्ध लोकांना अश्वत्थाम्याबद्दल इत्थंभूत माहिती मिळवावयास सुरवात केली.

त्या व्रीद्धांच्या तोंडून त्यांना असे समजले की हा अश्वत्थामा एका विशिष्ट वेषात भिक्षा मागण्यासाठी गावात येतो. तो मुख्यत: तेल मागतो. कारण त्याच्या डोक्यावर कधीही बरी न होणारी जखम आहे. आणि हे तेल त्या जखमेत भरण्यासाठीच त्याला लागते. हि जखम कुणाला दिसू नये यासाठी तो डोक्याला चिंधी गुंडाळतो. तेलाबरोबरच तो थोडे पीठही मागून घेतो.

जोशी मास्तरांनी अश्या प्रकारे अश्वत्थाम्याबद्दलची सर्व बारीक सारीक माहिती आधारे त्यांनी अश्वत्थाम्याला शोधून काढण्याचे ठरविले. त्यासाठी ते विशिष्ट वेळी डोळ्यात तेल घालून बसू लागले; परंतु बरेच दिवस लोटले तरी अश्वत्थाम्याच्या वर्णनाशी जुळेल असा एकही भिक्षेकरी त्याच्या आढळात आला नाही.

त्यामुळे आपण अश्वत्थाम्याविषयी ऐकलेल्या सर्व कथा या केवळ दंतकथाच असाव्यात असे त्यांना वाटले व त्यांनी त्याला शोधून काढण्याचा नाद सोडून देण्याचे ठरविले; परंतु पुढे चार-पाच दिवसांतच त्यांना हवा होता अगदी तश्याच वर्णनाचा एक भिक्षेकरी त्यांच्या दारात आला . जोशी मास्तरांनी त्याच्या शरीरावरील सर्व खाणाखुणा बारकाईने तपासल्या व तो भिक्षेकरी म्हणजे अश्वत्थामाच असला पाहिजे अशी त्यांची मनोदेवता त्यांना सांगू लागली. त्या भिक्षेकार्याच्या डोक्याला खरोखरच जखम झालेली दिसत होती व त्याने त्यासाठी डोक्यावर चिंधीही गुंडाळलेली दिसत होती. दुसरे म्हणजे तो तेल व पिठाचीच भिक्षा मागत होता !

जोशी मास्तरांचा आनंद गगनात मावेना !!

त्यांनी त्या भिक्षेकाऱ्याला तेल घातले व पायात चपला घालूनते त्याच्या पाठलागावारच निघाले.

जोशी मास्तर आपला पाठलाग करीत आहेत हि गोष्ट त्या भिक्षेकऱ्याच्या फार उशिरा लक्षात आली . याचे कारण असे, कि जोशी मास्तर त्याला समजणार नाही अश्या बेतानेच त्याच्या पाठोपाठ चालले होते.

पण गावाची हद्द संपून जेव्हा भिक्षेकऱ्याने निबिड जंगलात प्रवेश केला तेव्हा त्याला जोशी मास्तरांची चाहूल लागली. कारण त्या निर्जन जागेत फार काळ लपूनछपून चालणे मास्तरांना शक्य न्हवते. याचे कारण तो भिक्षेकरी त्या कुठेतरी बेपत्ता होण्याचा संभव होता . म्हणून त्याच्या पाठोपाठ पूर्वीप्रमाणे अंतर ठेवून चालणे योग्य नव्हते.

त्या भिक्षेकऱ्याला जोशी मास्तरांची चाहूल तर लागलीच होती . त्यामुळे तो अधूनमधून मागे वळून त्यांच्याकडे पाहत होता.

त्याने आपल्याला पाहिले हि गोष्ट जोशी मास्तरानीही ओळखली होती ; परंतु ते जणू आपण त्या गावचेच नाही अशा थाटात त्यच्या पाठोपाठ चालत होते.

अखेर त्या भिक्षेकऱ्याला जोशी मास्तरांचा संशय आलाच.

हा गृहस्थ केवळ आपले गूढ उकलण्यासाठीच आपल्या पाठोपाठ येत आहे हे त्याला समजून चुकले व तो एकाकी थांबला. त्याने जोशी मास्तरांकडे किंचित रागाने पाहिले; परंतु जोशी मास्तरांनी त्याकडे लक्षच दिले नाही . तेही निमित्त करून एका झाडाजवळ उभे राहिले तो भिक्षेकरी पुढे निघाला तसे जोशी मास्तरही निघाले. असा प्रकार दोन-तीन वेळा झाला आणि मग तो भिक्षेकरी रागावला.

त्याने शुध्द मराठीत विचारले ," आपण माझा पाठलाग कशासाठी चालवलाय?"

त्यावर जोशी मास्तर म्हणाले ," आता स्पष्टच बोलू का?"

"हुं " तो भिक्षेकरी आपले टपोरे डोळे त्यांच्यावर रोखीत म्हणाला. त्या डोळ्यांतून जणू अग्निवर्षाव होत आहे, असे जोशी मास्तरांना वाटले .

"माफ करा -" जोशी मास्तर विनयाने म्हणाले," पण आपण कोण आहात हे मला कळेल का ? "

"मी कुणीही असेन तुम्हाला काय करायचे ?"

"असे चिडू नका , मला असे वाटते की ..की आपण भिक्षेकरी नसून महाभारत काळातील अश्वत्थामा आहात…।!" जोशी मास्तर धिटाईने बोलून गेले.

ते ऐकल्यावर मात्र तो भिक्षेकरी चपापला. थोडा नारमलाही. अन थोडा वेळ थांबून म्हणाला," आपली अटकळ बरोबर आहे ….

मी…अश्वत्थामाच आहे…!"

"काय? आपण खरे अश्वत्थामा आहात?"

"होय . मीच अश्वत्थामा"

"आपल्या दर्शनाने आनंद वाटला "

"मग आतातरी माझा पाठलाग सोडा"

"ते मात्र जमणार नाही हं !"

"हे पहा , तुम्हाला जे हवे ते मी देईन, पण कृपा करून माझा पाठलाग बंद करा "

"मला जे हवे ते तुम्ही द्याल? " जोशी मास्तरांनी खात्री करून घेण्यासाठी विचारले.

" होय.देईन, नक्की देईन !"

"मग...मग..."

"बोल … काय हवं तुम्हाला ?" अश्वत्थाम्याने विचारले. "लवकर … सांगा".

"माझी एकाच इच्छा आहे . फक्त एकच"

"कोणती?"

"मला धन, जडजवाहीर काही नको "

"मग?"

"पुरी कराल माझी इच्छा ?"

"होय. करीन, नक्की करीन"

"मग ऐका तर…. "

अश्वत्थामा कान देऊन लक्षपूर्वक ऐकू लागला

"थोडं चमत्कारिक आणि जगावेगळं मागणं आहे माझं…. "

"ते कसंही असो; पण लवकर सांगा "

"मला महाभारतकाळात घडलेलं भारतीय युध्द 'याचि देही याचि डोळा' बघायची इच्छा आहे… "

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel