अक्कलकोट निवासी श्रीस्वामीसमार्थांचे पुण्यातील एक निष्ठावान भक्त व वि. के. फडक्यांचे स्नेही श्री स. ना . भट यांनी एक दिवस फडक्यांना स्व:ताचा एक मोठा अद्द्भुत अनुभव सांगितला. ते म्हणाले, " एक दिवस मी सहज आकाशनिरीक्षण करत असताना एक मानवदेहधारी व्यक्ती चक्क आकाशातून उडत जात असताना मी स्पष्टपणे पाहिली. हि व्यक्ती म्हणजे अर्थातच एखादा सिद्धयोगी महापुरुष असला पाहिजे, यात संशय नाही . आज एकविसाव्या शतकातही असे चमत्कार दिसू शकतात. श्री . भटांचा अनुभव हा त्यापैकीच एक होय, असे म्हणावयास हरकत नाही. या "आकाशगमन सिद्धी"चा उल्लेख पतंजली मुनींनी आपल्या योगसुत्रात केलेला आढळतो. त्यांच्या योगसुत्रात पुढील एक योग आहे, "कायाकशयो: संबंधसंयमाल्लघुतूल- समापतेश्चाकाशगमनं ।।३-४२।। याचा अर्थ पंचमहाभूतांचे शरीर व त्यास आश्रय देणारे आकाश यांचे ठायी संयम केला असता आकाशगमन सिद्धी प्राप्त होते. लक्ष्मणाला ज्यावेळी शक्ती लागली व तो बेशुध्द पडला त्यावेळी याच शक्तीचा उपयोग करून मारुती आकाशमार्गाने जाऊन द्रोणागिरी पर्वत घेऊन आला. कारण त्याला अनेक सिद्धी अवगत होत्या. श्रीरामाने जे " हनुमानसहस्त्रनामस्तोत्र " रचिले आहे त्यामध्ये त्यांनी हनुमंताची-आपल्या एकनिष्ठ सेवकाची - स्तुती केलेली आहे . त्यात ' ऊर्ध्वग: ' असे एक नाम आहे. त्याचा अर्थ 'आकाशमार्गाने गमन करणारा' असे आहे. त्याचप्रमाणे एका श्लोकात ' उड्डीनोड्डीनगतिमान ' असाही श्रीरामांनी त्याचा उल्लेख केलेला आढळतो. याचा अर्थ 'आकाशचारी, खग: ' इत्यादी. ' योगवित ' चा अर्थ योग जाणणारा, असा होतो. परंतु त्याला केवळ 'योगिवत' असे म्हणून श्रीराम थांबलेले नाहीत तर त्याला पुढे ' योगकर्ता ' आणि ' योगयोनि: ' असेही म्हणतात. याचा अर्थ, तो केवळ योग जाणणारा नव्हता तर ' योगकर्ता ' म्हणजे योग निर्माण करणारा व ' योगयोनि: ' म्हणजे योगाच्या उत्पत्तीचे कारणही होता. काही ठिकाणी मारुती हा भगवान शंकराचाच अवतार समजला जातो आणि भगवान महादेव तर सर्वश्रेष्ठ योगी , आदीयोगी , योग निर्माते . त्यामुळे मारुती हादेखील एक महानयोगी होता व त्याला पतंजलींनी वर्णन केलेल्या सर्व शक्ती अवगत होत्या. मारुतीची हि हकीकत कुणाला कविकल्पना वाटण्याचा संभव आहे , म्हणून आपण फक्त तीनशे-चारशे वर्षापूर्वी प्रत्यक्षात घडलेल्या अशा काही सत्यकथा पाहू. या हकीकती इब्नबतूत या अरेबियन प्रवाशाने आपल्या रोजनिशीत टिपून ठेवलेल्या आहेत. इब्नबतूत हा चौदाव्या शतकात भारतात आला. त्याने कित्येक वर्ष सतत पायी प्रवास केला . या सर्व प्रवासाची गोळाबेरीज केली तर तो ७५,००० मैल इतकी प्रचंड भरेल . या प्रदीर्घ प्रवासात ज्या ज्या अद्द्भुत गोष्टी त्याला आढळल्या त्या त्याने आपल्या रोजनिशीत तरखीवर लिहून ठेवलेल्या आहेत. या घटना वाचताना आपण एका नवलाईच्या सृष्टीत प्रवेश करतो. इब्नाबतुत भारतात आला त्यावेळी दिल्लीला महंमद तुघलकाचे राज्य होते . या महंमद तुघलकाचा कारभार अतिशय अंधाधुन्दीचा व भोंगळ होता. इब्नाबतुत भारतात आल्याचे समजताच महंमद तुघलकाने त्याचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. त्याची उत्तम प्रकारे बडदास्त ठेवण्याचे हुकुम त्याने आपल्या कारभाऱ्यांना सोडले . बतूतचा अतिशय थाटाने त्याने सत्कार केला. त्याच्या कपड्याच्या धुलाईसाठी त्याने दोन हजार दिनार मंजूर करून टाकले . त्याच्या दिमतीला नोकरचाकर दिले. इब्नबतूतबरोबर त्याची मुलगीही भारतात आलेली होती ; परंतु दुर्दैवाने तिचा येथेच अंत झाला. महंमद तुघलकाने तिच्या दफनविधीसाठी सरकारी खर्चाने लागलीच व्यवस्था करून टाकली! एवढंच नव्हे , तर इब्नबतूतला दिल्लीचे काझीपद बहाल करून त्याला वार्षिक बाराहजार दिनार पगारही मंजूर केला. त्याशिवाय त्याला जहागीरीही तोडून दिली ती वेगळीच ! इब्नबतूतला हिंदी भाषा नसल्यामुळे बादशाहने ताबडतोब दोन दुभाषांची नेमणूक करून टाकली. महंमद तुघलकाने त्याची एवढी बडदास्त जी ठेवली त्यामागे त्याचा स्वार्थ होता. इब्नबतूतने आपल्या रोजनिशीत आपल्याविषयी गौरवपर लिहावे अशी त्याची इच्छा होती; परंतु इब्नबतूत सत्याचा पुजारी होता. त्याने बादशहाचा सत्कार स्वीकारला ; परंतु रोजनिशीत लिहिताना सत्याला डावलले नाही. त्याला बादशाहने दिल्लीचे काझीपद बहाल केल्याचा उल्लेख वर आलाच आहे; परंतु त्या पदाचा त्याला लवकरच वीट आला. त्याला दिल्लीतील खर्चिक रहाणी नकोशी झाली आणि पगार पुरत नसल्यामुळे थोड्याच दिवसांत त्याला पन्नास साथ हजार दिनारांचे कर्ज झाले. शिवाय महम्दाचे प्रजेवरिल अत्याचार त्याला उघड्या डोळ्यांनी बघणे अशक्य होऊन गेले. महंमदाने आपल्या धर्माधिकाऱ्याला फाशी दिल्यामुळे तर ," नको हे काझीपद व नको हे दिल्लीत राहणे" असे त्याला वाटू लागले व एक दिवस निराश होऊन तो घरी आला. त्याने आपली सर्व संपत्ती फकिरांना वाटून टाकली व दिल्ली सोडण्याचे ठरविले. तत्पूर्वी बादशहाची अखेरची भेट घ्यावी म्हणून तो थेट दरबारात गेला. बादशाहने त्याची प्रवासाची आवड लक्षात घेऊन त्याला म्हंटले ," प्रिय इब्न , तुला आता मी एका महत्वाच्या जागेवर नेमणार आहे. चीनमधील माझा वकील म्हणून तू काम पाहावेस अशी माझी मनापासून इच्छा आहे." इब्नबतूतला कुठूनतरी भारताबाहेर सटकायचे होते त्याने ताबडतोब बादशहाच्या त्या विनंतीला होकार दिला; परंतु तो चीनला जायला निघाला त्यावेळी त्याला वाटेतच काही रानटी टोळ्यांनी गाठून लुटले. इब्नबतुत कसातरी जीव वाचवून वाट फुटेल तिकडे पळत सुटला ; परंतु त्याला फार दूरवर पळता आले नाही. तो वाटेतच बेशुध्द होऊन पडला. शिपायांना जेव्हा हि हकीकत समजली तेव्हा त्यांनी त्वरेने धावत जाऊन त्याला मोठ्या काळजीपूर्वक दिल्लीला परत आणले. दिल्लीला परत तो बादशहाच्या संगतीत राहू लागला. या महंमद तुघलकाची काही योग्यांशी ओळख होती. एखाद्या वेळी तो योगी लोकांच्या संगतीत येउन राहत असे . "हे योगी मृत माणसाकडे नुसती नजर टाकून व काही मात्र पुटपुटून त्यांना जिवंत करीत, असे इब्नबतुतने एके ठिकाणी लिहून ठेवले आहे . " एकदा महंमद तुघलकाने अशाच एका योग्याची इब्नबतुतला ओळख करून दिली . तो योगी योगविद्येत पार पुढे गेला होता .त्याने इब्नबतुतला काही योग सामर्थ्य दाखवावे अशी बादशाहने त्या योग्याला नम्र विनंती केली . ती विनंती मान्य करून तो योगी उठला व थोड्याच वेळात तरंगत वर आकाशात गेला आणि चक्क भ्रमण करू लागला . इब्नबतुत च्या आश्चर्याला पारावार उरला नाही . बादशहाच्या खास वैद्यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला शुद्धिवर आणले . तो शुद्धीवर येउन वर पाहू लागला . तेव्हा तो योगी अजूनही आकाशात भ्रमण करीत असलेला दिसला . थोड्याच वेळात दुसरा एक योगी उठला व त्याने हातातील चंदनाचे खोड जोराने जमिनीवर आपटले व तोही तरंगत वर गेला व आकाशात विहार करू लागला . ते विलक्षण दृश्य पाहून इब्नबतुत इतका घाबरला , की त्याने भीतीने आपले डोळे गपकन मिटून घेतले व तो बादशाहाला म्हणाला, " महाराज , हे योग सामर्थ्याचे खेळ आपण कृपया लवकर थांबविले नाहीत तर मी जगण्याची आशाच नाही ." ते ऐकून बादशहाने योग्यांना विनंती करून ते प्रयोग ताबडतोब बंद करविले . इब्नबतुतने नंतर ही चक्षुर्वैसत्यम हकीकत जशीच्या तशी आपल्या रोजनिशीत लिहून ठेवली . त्या हकीकतीवरून भारतात योग्यांचे योगसामर्थ्य किती पराकोटीचे आहे याची कल्पना येउन शकते . इब्नबतुतला आणखी काही योगी प्रवासात भेटले . त्यांपैकी एकाने नारळाच्या झाडावरचा एक नारळ मंत्र सामर्थ्याने कळली पाडून दाखविला आणि त्यास खावयास दिला . ते त्याचे विलक्षण सामर्थ्य पाहून इब्नबतुतने त्याला बक्षीस म्हणून काही दिनार देऊ केले ; परंतु अनंताची इच्छा असलेल्या त्या योग्यासाठी हा पोरखेळ होता . त्या योग्याने हसून त्या नाण्यावर नुसती फुंकर मारली , त्या बरोबर जमिनीवर तशा चकचकीत नाण्यांचा भला थोरला ढीग निर्माण झाला . इब्नबतुतने ही सारी विलक्षण हकीकत तारीखवार आपल्या रोजनिशीत लिहून ठेवलेली आहे . वरील घटना कुणास असत्य वाटण्याचा संभाव आहे ; परंतु त्या पूर्णपणे खर्या असून अशा प्रकारचे सामर्थ्य संपन्न योगी त्या काळात भारतात होते ही गोष्ट नि:संशय खरी आहे . क्रमशः
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel