राहूल बजाज

दुचाकी वाहनांच्या उद्योगाच्या माध्यमातून महाराष्ट्रात व भारतातही विलक्षण वेगाने

औद्योगिक प्रगती साधणारे प्रभावी उद्योजक!

भारतात दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात क्रांती घडवणारे,तसेच बजाज परिवाराच्या राजकीय व सामाजिक कार्याचाही वारसा जपणारे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ उद्योगपती म्हणजे राहूल बजाज होत. गेली अनेक वर्षे (दुचाकी) वाहन उद्योग क्षेत्रात ते भारतात सातत्याने आघाडीवर आहेत. बजाज एशिया वीक ते पूना डायजेस्ट अशा वेगवेगळ्या नियतकालिकांच्या मुखपृष्ठांवर एक यशस्वी उद्योगपती म्हणून सतत १० वर्षे झळकत होते.

राहूल बजाज हे मूळचे कोलकत्याच्या मारवाडी कुटुंबातील; कमलनयन बजाज यांचे पुत्र.  राहूल बजाजांचे शिक्षण मुंबईच्या कॅथडल व जॉन कॉनन शाळेत झाले. अर्थशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजातून १९५८ मधे बी.ए. ची पदवी घेतली. नंतर १९६४ मध्ये हॉर्वर्डला जाऊन त्यांनी एम.बी. ए. केले. दरम्यानच्या काळात ते मुंबईला वकिलीचे शिक्षण घेत असतानाच बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये काम करीत होते. काही काळ ते मुकुंद कंपनीत ज्युनियर पर्चेस ऑफिसर (कनिष्ठ खरेदी अधिकारी) म्हणूनही कार्यरत होते. दरम्यान १९६१ मध्ये त्यांनी रूपा घोलप यांच्याशी विवाह केला.

कोणत्याही कंपन्यांवर कुरघोडी करून किंवा इतर कंपन्यांचे प्रकल्प चोरून त्यांनी आपले व्यावसायिक यश मिळविले नाही. उद्योगविश्र्वात त्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. बजाज हे  महात्मा गांधींच्या मूल्यांशी जास्त निगडीत असल्याचे जाणवते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मध्यमवर्गाशी जवळीक साधण्याच्या विचाराचा ठसा नेहमी जाणवतो.

बजाज ऑटोचे सर्वेसर्वा असूनदेखील ते स्वत: आवर्जून बजाज कंपनीचे ओळखपत्र वापरतात. सतत काम करीत राहण्याचे वेड असणार्‍या राहूलजींना सुट्टी घेणे फारसे आवडत नाही. १९६५ ते १९८४ या काळात त्यांनी केवळ ४ दिवस सुट्टी घेतली होती. एकंदरीत ३० वर्षे त्यांचे वास्तव्यही कारखान्याच्या परिसरातच होते. कदाचित म्हणूनच आजही बजाज कंपनीचे व्यवस्थापन चोख असल्याचे दिसते. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांच्या भेटी, बैठकी नेहमी प्रदीर्घ काळ चालतात. परंतु त्यांच्या विचारांशी तारा न जुळणार्‍या व्यक्तींना ते फार काळ सहनही करू शकत नाहीत.

अशा या विचारी व जिद्दी राहूल बजाज यांनी वयाच्या २६ व्या वर्षी १९६४ मध्ये बजाज टेम्पोचे उपमहाव्यवस्थापक म्हणून काम करायला सुरुवात केली. पुरोगामी विचार आणि कठोर परिश्रमांसह वाटचाल करीत आपला व्यवसाय त्यांनी वाढविला. बजाज ऑटो ही स्कूटर उत्पादन क्षेत्रातील जगातील वरच्या क्रमांकाची कंपनी आहे. फिनान्शिअल टाईम्स’च्या मते बजाज कंपनी हीजगातील उत्कृष्ट कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार्‍या भारतातील थोड्याच बड्या कंपन्यांपैकी एक आहे. १९८० च्या दशकात बजाज ऑटो ही देशातील सर्वांत वेगवान प्रगती करणारी कंपनी होती. पुण्याच्या ‘बी.बी.सी. (बजाज ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन)’ कडे भारतातील आर्थिक विषयातील आणि अन्य क्षेत्रातील पत्रकार कोणत्याही विषयावरील मत घेण्यासाठी जातात ही आणखी वेगळी विशेषता. विशिष्ट काळात (१९९५-९६ च्या दरम्यान)  परदेशी भागीदारी नसणारी, पूर्णत: भारतीय अशी बजाज ऑटो ही भारतातील मोजक्या कंपन्यांपैकी एक मोठी कंपनी होती.

लहानपणापासूनच नेतृत्वगुण व नेतृत्व क्षमता असणार्‍या राहूल बजाजांनी  ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वतीने आयोजित केल्या जाणार्‍या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिसंवादात भारताच्या शिष्टमंडळाचे १० वर्षे नेतृत्व केले आहे. इंडियन एअरलाईन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी काही काळ सांभाळली. सध्या ते राज्यसभेचे खासदार म्हणूनही कार्यरत आहेत.

बजाज यांना औद्योगिक संघटनांमध्ये रस असल्यानेच त्यांनी ‘कॉर्न्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (सी.आय.आय.)ला प्रभावी संघटना बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच इंडोब्रिटिश पार्टनरशीप इनिशिएटिव्हचे ते आश्रयदाते सदस्य आहेत.

तब्येतीच्या कारणामुळे बजाज ऑटोपासून ते थोडे लांब असले, तरी त्यांनी पूर्णत: निवृत्ती स्वीकारलेली नाही. अजूनही एखाद्या वितरणासाठी तयार असलेल्या गाडीची चाचणी घ्यायला ते जातात आणि सहकारी यांना मार्गदर्शन करतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel