"कां, तिचा कांही विशेष अपराध आहे का ?'
"तसें नाहीं. परंतु तिच्याबरोबर राहणें कठिण.'

"असें नको करूं, जा. आपल्या पत्नीस सांभाळ. तिला नीट वागव. प्रभूला भी. कारण ईश्वरानें सांगितलें आहे कीं आपल्या बायकांची काळजी घ्या, माझी भीति बाळगा.' परंतु झैदने ऐकलें नाहीं. शेवटीं काडीमोड झाली, मुहंमदांस फार वाईट वाटलें. श्रेष्ठकनिष्ठपणा जावा म्हणून हा विवाह मुद्दाम त्यांनीं लाविला होता. त्यांनीं हें लग्न जमविलेलें होतें. झैनब मुहंमदांकडे आली व मला तुमची पत्नी करा असा हट्ट धरुन बसली. मुहंमदांनीं तिचें पाणिग्रहण केलें. झैनब केवळ सुंदर म्हणून मुहंमद वरिते तर झैदची निष्ठा राहती का ? परंतु या लग्नानंतरहि झैदची भक्ति तशीच होती. मुहंमदांच्या शुध्द वृत्तीचा हाच मोठा पुरावा आहे.

एकदां बनी मुस्तलिक जमातीचा पाडाव करण्यासाठीं मुस्लिम सैन्य गेलें. लढाईनंतर अनेक कैदी आणिले गेले. त्यांत झुबेरिया एक स्त्री होती. मुहंमदांनीं तिची मुक्तता केली. ती म्हणाली, 'तुमचीच मला करा.' मुहंमदांनीं लग्न केलें. मुसलमानांनी हें ऐकलें. बनी मुस्तलिक जमात पैगंबरांशीं आतां संबध्द झाल्यामुळें सर्वांनीं आपापल्या जवळचे कैदी मुक्त केले. आणि ही जमात नवधर्म घेऊन मित्र झाली. मुहंमदांच्या या लग्नास सर्वांचे आशीर्वाद मिळाले. खैबरखिंडीजवळील ज्यूंवरील मोहिमेंत एक सफिया नांवाची ज्यू स्त्री होती. तिच्याजवळ मुहंमदांनीं लग्न केलें. माझ्या मनांत ज्यूविषयीं द्वेष नाहीं, हें जणुं त्यांनीं दाखविलें. मक्केंत मुहंमदांनीं मैमूनाजवळ विवाह केला. या विवाहामुळैं पूर्वीचे दोन विरोधी वीर इब्न अब्बास व खालिद बिन वलीद हे पैगंबरांच्या बाजूचे झाले. लढाईत पडलेल्यांच्या निराधार बायकांजवळहि त्यांनीं अशींच तीन लग्नें केलीं होतीं. त्यांच्या पाठीमागचा हेतु विषयासक्ति नव्हता. कांही विवाह करुणाप्रेरित होते. कांही कर्तव्यासाठीं. कांही त्या आरंभींच्या कठिण काळीं मिळालेल्या मित्रांचीं मनें न दुखवावीं म्हणून. कांहीं जातिजमातींतील वंशपरंपरा चाललेलीं भांडणें मिटविण्यासाठीं. मुहंमदांच्या या अशा विवाहांनीं अनेक जाति एक झाल्या. या विवाहांतून वैरें विझलीं, प्रेम वाढलें. नवीन संघटित अरब राष्ट्र निर्माण झालें.

कोणी म्हणतात कीं, यांतील कांहीं लग्नें पुत्रेच्छेनेंहि केलीं गेलीं असतील. खदिजेपासून जे मुलगे झाले ते सारे लहानपणींच मेले. मुलगा वांचला नाहीं. त्यांना त्यांचे निंदक 'अल-अब्तर' शेपुट तुटलेला असें म्हणत. ज्याला पुत्र नाहीं तो दुर्दैवी मानला जाई. या हेतूनेंहि कांही विवाह केले असतील. मुहंमद हे मानवच होते. ते ईश्वर नव्हते. मी साधा मनुष्य आहें, तुमच्यासारखा, असेंच ते अगर्वतेनें म्हणत.

मुहंमदांवर विलासीपणाचा आरोप माणुसकी असणारा माणुस करणार नाहीं, खदिजेविषयीं किती प्रेम ! ती वृध्द होऊन मेल्यावरहि तिची आठवण येतांच मुहंमद सद्गदित होत. तिची प्रेमळ आठवण त्यांना मरेपर्यंत होती. एकदां आयेषा खदिजेविषयीं कांहीं अपमानास्पद बोलतांच मुहंमदांना अपार दु:ख झालें. ते म्हणाले, 'जगांत माझ्यावर कोणाचा विश्वास नव्हता तेव्हां तिनें ठेवला. तिची स्मृति पवित्र आहे.' लेनपूल लिहितो, 'कबरेंत पडलेल्या वृध्द पत्नीची अशी प्रेमळ स्मृति बाळगणें हें महानुभाव पुरुषाचें लक्षण आहे. विषयी किडयांच्याजवळ अशी थोर वृत्ति आढळणार नाहीं.'

थोरांच्या लग्नांत महान् अर्थ असतात. जणुं ते पति बनून पालक होतात. सांभाळकर्ते होतात. तें तुम्हां आम्हांस जमणार नाहीं. विष भगवान् शंकरच पचवतील. सात वर्षांच्या मुलीजवळ निग्रही मुहंमदच लग्न लावूं शकतील. तुम्ही आम्ही याचें अनुकरण करायचें नसतें. तसें करायला पैगंबरांनीं सांगितलें नाहीं. सात वर्षांच्या या मुलीखेरीज बाकीच्या बायका विधवा होत्या. मुहंमदांनीं सर्वांचा सांभाळ केला. या आपल्या भार्यांमार्फत स्त्रियांत ते धर्मप्रचारहि करीत. स्त्रियांत येरवीं विचार कसे जाणार ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel