(तूं श्रेष्ठ मुनि होणार) हें असिताचें वचन यथार्थ आहे असें मी जाणलें. आणि म्हणून सर्व वस्तुजाताच्या पार गेलेल्या गोतमाला मी विचारतो.

हे मुने, गृहत्याग करून भिक्षेवर उपजीविका करणार्‍या उत्तम पद असें मौनेय कोणतें हें विचारतों, तें मला सांग.२

मौनेय कोणते हें मी तुला सांगतो- असे भगवान म्हणाला. ते दुष्कर आणि दुरभिसंभव आहे. तथापि मी ते तुला सांगतो. संभाळून वाग व दृढ हो. ३

गावांत कोणी निंदा केली किंवा स्तुति केली असतां सर्वांविषयी समानभाव बाळगावा. मनांतल्या मनांत क्रोध आवरावा, शांत आणि निगर्वी व्हावें. ४

पेटलेल्या अरण्यांतील अग्निज्वालांप्रमाणें गावांत स्त्रियां फिरतात. त्या मुनीला भुलवितात. त्यांनी तुला मोहांत पाडूं नये याबद्दल सावध राहा.५

लहानमोठे कामोपभोग सोडून स्त्रीसंगापासून विरत हो. स्थिरचर प्राण्यांचा विरोध आणि आसक्ति सोड.६

जसा मी तसे हे, व जसे ते तसा मी, असें आपल्या उदाहरणाने जाणून कोणाला मारूं नये व मारवू नये. ७

ज्या इच्छेंत आणि लोभांत सामान्यजन्य बध्द होतो, त्या इच्छेचा आणि लोभाचा त्याग करून चक्षुष्मन्ताने हा नरक तरून पार जावें. ८

पोटभर चापून न खाणारा, मिताहारी, अल्पेच्छ व अलोलुप व्हावें. तोच इच्छा सोडून तृप्त झालेला अनिच्छ शांत होतो. ९

मुनीने भिक्षाटन करून वनांत यावें व तेथे झाडाखाली आसनावर बसावें. १०

त्या ध्यानरत धीर पुरूषाने वनांत आनंद मानावा. त्याने झाडाखाली बसून मनाला संतोषवीत ध्यान करावे ११

त्यानंतर रात्र संपल्यावर गावांत यावें. तेथे मिळालेल्या आमंत्रणाने किंवा भेटीने उल्लसित होऊ नये. १२

मुनीने गावांतील कुंटुंबाशीं सलगी करूं नये, भिक्षेंसबधी कांही बोलूं नये, सूचक शब्द उच्चारू नयेत. १३

भिक्षा मिळाली तरी चांगलें, न मिळाली तरी चांगलें, दोन्हीविषयीं तो समभाव ठेवतो व (आपल्या राहण्याच्या) झाडापाशीं येतो. १४
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel