आणि भिक्षुहो, अर्हन्, सम्यक् संबुद्ध विपस्सी भगवंताच्या मनात धर्मोपदेश करण्याचा विचार आला. पण त्याला वाटले, हा गंभीर, दुर्दर्श, समजण्यास कठीण, शांत, प्रणीत, तर्काने न कळण्यासारखा, निपुण, पंडितांनीच जाणण्याला योग्य असा धर्म मी प्रश्नप्त करून घेतला आहे. पण हे लोक चैनीत गढलेले, चैनीत रमणारे, अशांना कारणपरंपरा, प्रतीत्यसमुत्पाद समजणे कठीण आहे. सर्व संस्कारांचे शमन, सर्व उपाधींचा त्याग, तृष्णेचा क्षय, विराग, निरोध, निर्वाण देखील त्यांना दुर्गम आहे. मी धर्मोपदेश केला आणि तो त्यांना समजला नाही, तर मलाच त्रास; मलाच उपद्रव होईल.

आणि भिक्षुहो, विपस्सी भगवंताला पूर्वी कधी न ऐकलेल्या पुढील गाथा अकस्मात सुचल्या-

जे मी प्रयासाने मिळविले आहे, ते इतरांस सांगणे नको
रागद्वेषाने भरलेल्यांना या धर्माचा बोध सहज होण्याजोगा नाही।।
प्रवाहाच्या उलट जाणारा, निपुण, गंभीर, दुर्दर्श आणि अणुरूप
असा हा धर्म अंध:काराने वेढलेल्या कामासक्तांना दिसणार नाही।।

भिक्षुहो, अर्हन्त सम्यक्संबुद्ध विपस्सी भगवंताचे ह्या विचाराने धर्मोपदेशाकडे चित्त न वळता एकाकी राहण्याकडे वळले. महाब्रह्मा तो विचार जाणून आपल्याच मनात उद्गारला, ‘‘अरेरे! जगाचा नाश होत आहे! विनाश होत आहे!! का की, अर्हन् सम्यक्  संबुद्ध विपस्सी भगवंताचे मन धर्मोपदेश करण्याकडे न वळता एकाकी राहण्याकडे वळते!’’

तेव्हा भिक्षुहो, जसा एखादा बलवान् पुरुष आखडलेल्या हात पसरतो किंवा पसरलेला आखडतो, इतक्या त्वरेने तो महाब्रह्मा ब्रह्मलोकात अंतर्धान पावून विपस्सी भगवंतापुढे प्रकट झाला आणि आपले उपवस्त्र एका खांद्यावर करून उजवा गुडघा जमिनीला टेकून हात जोडून भगवंताला म्हणाला, भगवन्, धर्मदेशना कर! सुगत, धर्मदेशना कर! काही प्राणी असे आहेत की, त्यांचे डोळे धुळीने भरले नाहीत. ते धर्म ऐकण्यास न मिळाल्यामुळे नाश पावत आहेत. असे धर्म जाणणारे लोक मिळतील.’’

विपस्सी भगवंताने आपल्या मनातील विचार तीनदा प्रकट केला आणि ब्रह्मदेवाने तीनदा भगवंताला तशीच विनंती केली. तेव्हा भगवंताने ब्रह्मदेवाची विनंती जाणून आणि प्राण्यांवरील दयेमुळे, बुद्धनेत्राने जगाचे अवलोकन केले आणि ज्यांचे डोळे धुळीने थोडे भरले आहेत, ज्यांचे फार भरले आहेत, तीक्ष्णद्रियांचे मृदु इंद्रियांचे, चांगल्या आकाराचे, वाईट आकाराचे, समजावून देण्यास सोपे, समजावून देण्यास कठीण; आणि काही परलोकाचे व वाईट गोष्टीचे भय बाळगणारे, असे प्राणी त्याला दिसले. ज्याप्रमाणे कमलांनी भरलेल्या सरोवरात काही कमले पाण्याच्या आतच बुडून राहतात, काही पाण्याच्या सपाटीवर येतात, आणि काही पाण्याहून वर उगवलेली असतात, पाण्याचा ज्यांना स्पर्श होत नाही, तशा प्रकारे विपस्सी भगवंताने भिन्नभिन्न प्रकारचे प्राणी पाहिले.

आणि भिक्षुहो, विपस्सी भगवंताच्या मनातील हा विचार जाणून ब्रह्मदेवाने पुढील गाथा म्हटल्या-

‘‘शैलावर, पर्वताच्या मस्तकावर उभा राहून ज्याप्रमाणे सभोवारच्या लोकाकडे पाहावे, त्याप्रमाणे हे सुमेध, धर्ममय प्रासादावर चढून समन्तात् पाहणारा असा तू शोकरहित होत्साता जन्म आणि जरा यांनी पीडलेल्या जनतेकडे पाहा!’’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel