वितर्कांवर ताबा

बोधिसत्त्वाने सात वर्षे तपश्चर्या केली असा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. या सात वर्षांत बोधिसत्त्व प्राधान्येकरून देहदंडन करीत असला तरी त्याच्या मनात दुसरे विचार घोळत नव्हते, असे नाही. वर दिलेल्या तीन उपमा पाहिल्या तरी असे दिसून येते की, कामविकार पुरे नष्ट केल्यावाचून नानाविध कायक्लेशांचा उपयोग होणार नाहीत हे त्याला स्पष्ट दिसत होते. याशिवाय आणीकीही सद्विचार त्याच्या मनात येत, असे अनेक सुत्तावरून दिसते. त्यापैकी काही विचाराचा येथे थोडक्यात संग्रह करीत आहे.

मज्झिमनिकायातील द्वेधावितक्क सुत्तात भगवान म्हणतो, “भिक्षु हो, मला संबोध प्राप्त होण्यापूर्वी मी बोधिसत्त्व असतानाच माझ्या मनात असा विचार आला की, वितर्कांचे दोन भाग करावे. त्याप्रमाणे कामवितर्क (विषयवितर्क), व्यापादवितर्क (द्वेषवित्तर्क), आणि विहिंसावितर्क (दुसर्‍याला किंवा आपणाला त्रास देण्याचा वितर्क) या तीन वितर्काचा मी एक विभाग केला. आणि नैष्कर्म्य (एकान्तवास), अव्यापाद (मैत्री) आणि अविहिंसा (त्रास न देण्याची बुद्धि) या तीन वितर्कांचा दुसरा विभाग केला. त्यानंतर मी मोठ्या सावधगिरीने व दक्षतेने वागत असता पहिल्या तीन वितर्कंपैकी एखादा वितर्क माझ्या मनात उत्पन्न होत असे. त्या वेळी मी विचार करीत होतो की, हा वाईट वितर्क माझ्या मनात उत्पन्न झाला आहे. तो माझ्या दु:खाला दुसर्‍याच्या दु:खाला किंवा उभयताच्या दु:खाला कारणीभूत होईल, प्रज्ञेचा निरोध करील व निर्वाणाला जाऊ देणार नाही. या विचाराने तो वितर्क माझ्या मनातून नाहीसा होत असे.

“भिक्षु हो, शरदृतूत जिकडे तिकडे शेते पिकाला आली असता गुराखी गुरांचे मोठ्या सावधगिरीने रक्षण करतो. काठीने बडवून देखील त्यांना शेतापासून दूर ठेवतो. का की, तसे केले नाही तर गुरे लोकांच्या शेतात शिरतील आणि आपणाला दंड भरावा लागेल हे तो जाणतो. त्याप्रमाणे काम, व्यापाद, विहिंसा इत्यादिक अकुशल मनोवृत्ति भयावह आहेत हे मी जाणले.

“त्या वेळी मी मोठ्या सावधगिरीने आणि उत्साहाने वागत असता माझ्या मनात नैष्कर्म्य, अव्यापाद आणि अविहिंसा ह्या तीन वितर्कांपैकी एखादा वितर्क उत्पन्न होत असे. तेव्हा मी असा विचार करीत होतो की, हा कुशल वितर्क माझ्या मनात उत्पन्न झाला आहे. ती आपणाला, परक्याला किंवा उभयतांना दु:ख देणारा नव्हे. प्रज्ञेची अभिवृद्धि करणारा व निर्वाणाला पोहचविणारा आहे. त्याचे सर्व रात्र किंवा सर्व दिवस चिंतन केले तरी त्यापासून भय नाही. तथापि पुष्कळ वेळ चिंतन केले असता माझा देह श्रान्त होईल आणि त्यामुळे माझे चित्त स्थिर राहणार नाही आणि अस्थिर चित्ताला समाधि कोठून मिळणार? म्हणून (काही वेळाने) माझे चित्त मी अभ्यन्तरीच स्थिर करीत असे. एखादा गुराखी उन्हाळयाच्या शेवटी पिके लोकांनी घरी नेल्यावर गुरांना कुशाल मोकळे सोडून देतो. तो झाडाखाली असला किंवा मोकळ्या जागेत असला तरी गाईंवर नजर ठेवण्यापलीकडे दुसरे काही करीत नाही. त्याप्रमाणे नैष्कर्म्यादि कुशल वितर्क उत्पन्न झाले असता हे कुशल धर्म आहेत एवढीच मी स्मृति ठेवीत होती. (त्यांचा निग्रह करण्याचा प्रयत्न करीत नसे).”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel