त्या खोलीत चौघांना सुरक्षित वाटत असतं. तर बाहेर त्या दोन दृष्ट शक्तींचा तांडव सुरू असतो.त्यांच गुरगुरण, सामानांची आदळआपट ,समीरला बाहेर बोलावणं हे सारं सुरू असतं. पण समीर व त्याचे मित्र त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नाही हे पाहून त्या आत्मा गायब होतात.समीर त्या खोलीचं निरीक्षण करत असतो .कमालीच प्रसन्न वाटतं असते तिथे आणि त्या फोटोतील स्त्री किती सोज्वळ असते. अचानक त्या खोलीत क्षणभरासाठी दिव्य प्रकाश पडतो ज्याने या चौघांचे डोळे दिपतात. आणि ती फोटोतील स्त्री यांच्या समोर प्रगट होते.तिला बघून पहिले तर चौघे घाबरतात अजून कुठलं नवीन संकट आपल्या पुढे उभं तर नाही न म्हणून ते घाबरतात. ती स्त्री बोलायला लागते.


   " घाबरू नका पोरांनो, मी काहीही करणार नाही तुम्हाला .(समीरकडे बघून तिच्या डोळ्यात पाणी येत) समीर आलास बाळा ,अरे किती वर्षांपासून तुझी वाट पाहात आहे.तू कधी येशील आणि कधी त्या दृष्ट शक्तींपासून हा वाडा मुक्त करशील या कडे आस लावून होते मी" त्या स्त्रीच्या बोलण्यात खूप माया असते..
" कोण तुम्ही?मला कश्या ओळखता? आणि तुम्हाला या वाड्याबद्दल काय माहिती आहे?" समीर..

" सांगते सगळं सांगते. तुम्ही वाड्यात आल्यापासून या खोलीत येण्याचीच वाट पाहत होते मी. समीर तुला या वाड्याच्या इतिहास बद्दल आणि त्या दोन दृष्ट शक्ती बद्दल सगळं सांगायच होत. या वाड्याबद्दल तुझ्या वडिलांही काही माहिती नाही.पण बाळा तुझ्या जीवाला धोका आहे इथे त्याचीच काळजी वाटते आहे. तुम्हाला माहीत नाही त्या दोन आत्मा किती शक्तीशाली आहेत .तुम्ही त्या खोलीत बंद केलेल्या अमानवी शक्तीला तिथून मुक्त केलं आहे आता त्यांची शक्ती एक झाली आहे. "

" तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका .काहीही होणार नाही मला,माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत. माझं काहीही झालं तरी चालेल पण मला माझा हा वाडा त्या सैतांनापासून मुक्त करायचा आहे. तुम्ही या वाड्याबद्दल आम्हाला सांगा" समीर

समीरच बोलणं ऐकून त्या स्त्रीच्या डोळ्यात अश्रू तरळतात." शोभतोस बाळा पाटील घराण्याचा वंशज .धाडसी आहेस. आता मी काय सांगते ते नीट ऐका. समीर तुझे खापरपणजोबा आबासाहेब या गावातले सर्वेसर्वा होते ,त्याला कारणही तसंच होत आबासाहेब न्यायप्रिय होते, गरजूची मदत करायचे त्यांच्याकडे आलेला व्यक्ती कधी रिकाम्या हाती जात नसे.म्हणून गावातले लोक त्यांना देवासारखे मानत. आबासाहेबांचा एकुलता एक मुलगा रावसाहेब ही अगदी आबासाहेबांसारखेच होते त्यांच्या आई म्हणजे रुख्मिणी बाई रावसाहेब दहा वर्षाचे असतील  तेंव्हा त्यांचे निधन झाले. आबासाहेबांनी रावसाहेबांना लहानाच मोठं केलं ,नंतर रावसाहेबांच ही लग्न झालं आणि मुलगा झाला ते म्हणजे माधवराव तुझे आजोबा भाऊसाहेब घरात त्यांना भाऊ म्हणत पण दुर्दैवाने भाऊ सहा महिन्यांचे असतील तेंव्हा आजरपणात त्यांच्या आई रमाबाईंचे निधन झाले. लहानग्या भाऊंचे खूप हाल होत होते म्हणून आबसाहेबांनी रावसाहेबांचं दुसरं लग्न लावून दिल आणि नलिनीबाई या घरात सून बनून आल्या .वाड्यात दुसरं कोणी बाईमाणूस नसल्याने घरची धुरा नलिनीबाईंच्या हाती दिली अगदी तिजोरीच्या चाव्या सुध्दा.  नलिनीबाई अत्यंत धुर्ती होत्या पैशाच्या लोभामुळे त्यांनी रावसाहेबांशी लग्न केलं पण भाऊंची आई कधीच झाल्या नाही .सवतीचं पोरं म्हणून त्यांनी कायम भाऊंचा राग केला. आबासाहेब आणि रावसाहेब कामानिमित्त नेहमी घराबाहेर असत याचा फायदा त्या घेत होत्या. वाडयात गंगाबाई नावाची एक बाई काम करायची भाऊंच सगळं तीच करायची .नलिनीबाई आपल्या मौजमजा करायच्या .आबासाहेब आणि रावसाहेबांसमोर मात्र भाऊंवर खूप प्रेम असल्याचा दिखावा करायच्या. भाऊ दोन वर्षाचे असतील तेंव्हा नलिनी बाईंनी एका मुलाला जन्म दिला आणि तो म्हणजे संग्रामराव. नलिनीबाईंनी सावत्रपणाची बीज संग्रामच्या मनातही रोवली .आईप्रमाणे संग्रामही स्वार्थी ,धूर्त होता. भाऊ आणि संग्राम जस जसे मोठे झाले तसा त्यांच्या स्वभावातील फरक ही ओळखु येऊ लागला. भाऊ खूप समंजस, मोठ्यांचा आदर करणारे, गावातील लोकांसाठी झटणारे तर संग्राम धूर्त, कपटी,वाईट वळणाचा, जुगारी, व्यसनी त्यात आईचा लाडोबा .नलिनीबाई त्याचे सगळे गुन्हे लपवायच्या . भाऊंच आपल्या सावत्र आई आणि भावावर खूप प्रेम होतं मात्र ती दोघ कायम भाऊंचा राग करायचे. भाऊ सद्गुणी होते म्हणून त्यांच सर्वत्र कौतुक व्हायचं आबसाहेबांच्या ही अधिक लाडाचे होते ते.आपली सर्व जबाबदारी भाऊ च नीट सांभाळतील याची खात्री त्यांना होती आणि अस ते बोलूनही दाखवत याचाच राग नलिनीबाई आणि संग्रामला यायचा.सगळी संपत्ती भाऊंच्या नावे करतील याची भीती त्यांना असायची. दिवसामागून दिवस जात होते. भाऊ गावच्या विकासासाठी नवनवीन गोष्टी शिकत होते तर संग्राम अजून वाया जात होता. अशातच नलिनीबाई खुप आजारी पडल्या हळूहळू त्यांची तब्येत खालावत चालली होती.  भाऊ नलिनीबाईंची दिवसरात्र सेवा करायचे आणि संग्राम मात्र आपल्या आयुष्यात खुश होता कायम नशेत राहायचा आपली आई अंथरुणावर खिळली आहे याची जराही त्याला पडलेली नव्हती.आता मात्र नलिनी बाई मनातून खजील झाल्या होत्या सावत्रमुलगा म्हणून ज्याचा  रागाराग केला तोच मुलगा आज आपली इतकी सेवा करतो आहे आणि ज्याला जन्म दिला तो तर साधं येऊन ही बघत नाही.  मारतांना नलिनीबाई भाऊंना भरभरून आशीर्वाद देऊन गेल्या.

     संग्राम पूर्णपणे हाताबाहेर गेला होता .आता गावातले काही लोक आबासाहेबांकडे तक्रारी घेऊन येऊ लागले . वाईट संगत होती संग्रामची वडिलोपार्जित पैस्यावर मजा मारायचा. गावातल्या लोकांकडून पैसे उकलायचा. आबासाहेब, रावसाहेब आता संग्रामच्या उपद्व्याप ला कंटाळले होते .आबासाहेबांनी शेवटी एक निर्णय घेतला आणि संग्रामला तो निर्णय सांगितला . ते ऐकून संग्राम खुप चिडला ,त्याने विरोध केला पण आबसाहेबांनी त्याला सरळ धमकीचं दिली की जर आमचं ऐकलं नाही तर संपत्तीतून बेदखल करेल आणि हे संग्रामला परवडण्यासारखे नव्हतं म्हणून त्याने आबासाहेबांचा निर्णय मान्य केला. तो निर्णय होता संग्रामच्या लग्नाचा .भाऊंपेक्षा संग्राम लहान होता पण त्याची वागणूक पाहून आबासाहेबांना वाटलं की संग्रामच लग्न झालं तर तो सुधारेल ,अंगावर जबाबदारी पडली म्हणजे त्याचा बेजबाबदारपणा जाईल  .संग्राम कसाबसा लग्नाला तयार झाला . गावात तर त्याला कोणी मुलगी दयायला तयार ही नव्हतं म्हणून लांबच्या गावातली एका गरीबाची मुलगी संग्रामसाठी पाहिली लग्न अगदी साधेपणात करण्यात आलं. आता संग्रामची पत्नी निर्मला या वाड्यात आली. निर्मला खूप संस्कारी मुलगी होती. आबसाहेबांनी वाड्याच्या चाव्या निर्मला कडे सोपवतांना तिला सांगितलं होतं की जोवर भाऊंच लग्न होऊन त्यांची पत्नी वाडयात येत नाही तोवर वाड्याची जबाबदारी तुझी. भाऊंची पत्नी आली की थोरली सून म्हणून या चाव्या तिच्याकडे सुपूर्द करायच्या .निर्मलाने आनंदाने हे स्वीकारलं होत. निर्मालाच्या येण्याने घराला घरपण आलं होतं .संग्राम ही नीट वागू लागला होता .आबासाहेबही हे सगळं बघून खूप आनंदी होते. काही महिने तर खूप सुखाचे गेले आणि  अचानक आबासाहेबांची तब्येत खराब झाली वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले .आबासाहेबांच्या जाण्याने रावसाहेब, भाऊ ,निर्मला आणि अख्खा गाव हळहळला होता. त्यांच्या जाण्याने वाडा पोरका झाला होता. संग्रामला मात्र अजिबात दुःख नव्हते.उलट तर त्याला रान मोकळ झालं .त्याचे जुने उपद्व्याप पुन्हा सुरू झाले आता त्याला आबासाहेबांचा धाक नव्हता. निर्मलाला त्याच हे वागणं नवीनच होत .संग्राम तिच्या चोरून तिजोरतील पैसे काढून घ्यायचा .तीच लक्ष गेलं तर ती विरोध करायची मग संग्राम तिला मारझोड ही करू लागला. आता निर्मलाला त्याची भीती वाटायला लागली होती. त्याच खरं रूप तिच्या समोर आलं.अश्यातच निर्मला गरोदर राहिली. तरीही संग्राम काही सुधारला नाही तिची काळजी घेणं तर सोडा पण रात्र रात्र तो घराबाहेर राहू लागला. भाऊंच्या हे लक्षात आलं त्यांनी संग्रामची चांगली कानउघाडणी केली ,यावरून उलट संग्राम भाऊंशी खूप भांडला. दोन महिन्यांनी भाऊंच ही लग्न झालं आणि थोरल्या सुनबाई जानकीबाई वाड्यात आल्या आबसाहेबांनी सांगितल्या प्रमाणे निर्मलाने वाड्याची सगळी जबाबदारी आणि चाव्या जानकीबाई च्या हाती दिल्या. जानकीबाईंना खरंतर थोरलेपणाचा जराही आव नव्हता खूप साध्या, सरळ अन मनाने खूप प्रेमळ होत्या त्या. आल्या तस त्यांनी निर्मलाची  जबाबदारी स्वतः घेतली ,तिची काळजी त्या घेऊ लागल्या. सख्या बहिणी सारख्या दोघी राहू लागल्या पाहता पाहता निर्मालाचे नऊ महिने भरले आणि तिने एका गोड मुलीला जन्म दिला. वाड्यात सगळ्यांना आनंद झाला .रावसाहेब तर खूप आनंदी होते चार पिढ्यानंतर वाड्यात मुलगी जन्माला आली होती.पण संग्राम मात्र खूप नाराज झाला कारण त्याला मुलगा हवा होता ,म्हणून तो त्या लहानग्या मुलीला पाहायला सुद्धा गेला नाही. निर्मला बिचारी त्याच्या अश्या वागण्याने दुःखी झाली.


    रावसाहेबांनी मोठया थाटात बाळाचं बारस केलं ,सगळं गाव वाड्यावर  बारश्या साठी आलं होतं पण बाळाचे बाबा मात्र तिथे हजर नव्हते.सकाळपासून च संग्राम बाहेर निघून गेला होता तो अजून परतला नव्हता.भाऊ स्वतः त्याला शोधायला गेले पण त्याचा कुठे काही पत्ताच नव्हता. शेवटी भाऊ वाड्यावर परत आले. बाळाचं नाव ही ठेवलं तरी संग्रामचा आला नाही. आणि अचानक गर्दीतून आवज आला संग्रामराव आले म्हणून .पण संग्राम एकटा नव्हता आला तर सोबत या वाड्याची ही अधोगती  जिच्या मुळे झाली ती ब्याद घरात घेऊन आला ती होती कालिंदी" हे सगळं सांगताना आबासाहेब,रावसाहेब, भाऊ, जानकीबाई आणि निर्मला बद्दल असणारा आदर ,प्रेम  त्या स्त्रीच्या बोलण्यात जाणवतहोता तर संग्राम विषयी राग ,चीड जाणवते..

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel