गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले. पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकांच्या क्रोधाचा उद्वेग झाला आणि अनेक ठिकाणी हिंसक विरोध झाले. गांधीजींनी जालियनवाला बाग हत्याकांड तसेच त्यानंतरचे हिंसक विरोध दोन्हींचा निषेध केला. त्यांनी या दंग्यांना बळी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांबद्दल सहानुभुती दर्शविणारा आणि दंग्यांचा निषेध करणारा एक ठराव मांडला. या ठरावाला काँग्रेसमध्ये सुरुवातीला विरोध झाला. पण गांधीजींच्या तत्त्वांनुसार कोणत्याही प्रकारची हिंसा ही पाप होती आणि त्याचे समर्थन करता येणे शक्य नव्हते. हे तत्त्व मांडणार्‍या त्यांच्या भावनाप्रधान भाषणानंतर काँग्रेसने त्यांचा ठराव मान्य केला. पण या हत्याकांडाच्या आणि त्यानंतरच्या हिंसेच्या पश्चात गांधीजींनी आपले सर्व लक्ष पूर्ण स्वराज्यावर केंद्रित केले. त्यांच्या पूर्ण स्वराज्याच्या कल्पनेत पूर्ण वैयक्तिक, धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्य समाविष्ट होते.

डिसेंबर इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण अधिकार गांधीजींना देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पुनर्बांधणी नवीन संविधानानुसार करण्यात आली. ज्याचा मुख्य उद्देश होता - स्वराज्य. पक्षाचे सभासदत्व थोड्याशा फीच्या मोबदल्यात सर्वांना खुले करण्यात आले. पक्षातील शिस्त वाढवण्यासाठी श्रेणीनुसार समित्या बनवल्या गेल्या. यामुळे फक्त उच्चभ्रूंसाठीच समजल्या जाणार्‍या पक्षाचे स्वरूप बदलले आणि काँग्रेस जनसामांन्याचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष बनला. गांधीजींनी अहिंसेच्या तत्त्वाला स्वदेशीची जोड दिली. त्यांनी सर्वांना परदेशी - विशेषत: ब्रिटिश - वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. या तत्त्वानुसार सर्व भारतीयांनी ब्रिटिश कपड्यांच्या ऐवजी खादीचा उपयोग करावा असे अभिप्रेत होते. प्रत्येक भारतीय पुरूष आणि स्त्रीने, प्रत्येक गरीब आणि श्रीमंत व्यक्तीने, दिवसाचा काही काळ भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनार्थ चरख्यावर सूत कातावे असा गांधीजींचा आग्रह होता. याचा मुख्य उद्देश शिस्त आणि स्वावलंबनाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवणे तसेच स्त्रियांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करूण घेणे हा होता. ब्रिटिश वस्तूंच्या बहिष्काराबरोबरच ब्रिटिश शैक्षणिक संस्थांचा बहिष्कार, सरकारी नोकरीचा त्याग आणि ब्रिटिशांनी दिलेल्या मान आणि पदव्यांचा त्याग करण्याचे आवाहन गांधीजींनी केले.

असहकार चळवळीला समाजातील सर्व स्तरांमधून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण असहकार चळवळ जोमात असतांनाच असस्मात थांबवण्यात आली. याला कारण ठरले,उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा गावात चळवळीला मिळालेले हिंसक वळण. ४ फेब्रुवारी इ.स. १९२२ रोजी पोलिसांनी जमावावर केलेल्या गोळीबाराने संतप्त होऊन आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला व नंतर पोलिस ठाण्याला आग लावली. जमावावरील गोळीबारात तीन जण मरण पावले तर पोलिस ठाण्यात २३ पोलिस जळून मरण पावले. पुढे अजून जास्त हिंसक घटना घडतील या भीतीने गांधीजींनी चळवळ स्थगित केली. १० मार्च इ.स. १९२२मध्ये गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली व सहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. इ.स. १९२४ मध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर अपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या कारणावरून त्यांची सुटका करण्यात आली.

गांधीजी तुरुंगात असतांना त्यांच्या नेतृत्वाअभावी काँग्रेसमध्ये फूट पडू लागली. शेवटी काँग्रेसचे दोन गटात विभाजन झाले. एका गटाचे नेतृत्व चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्याकडे होते. हा गटाचा कल संसदीय कार्यकारणीत भाग घेण्याकडे होता. पण चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखालील दुसर्‍या गटाचा याला विरोध होता. हिंदू-मुस्लिमांमधला चळवळीदरम्यान वाढीस लागलेला एकोपासुद्धा हळूहळू कमी होत होता. गांधी़जींनी हे मतभेद दूर करण्याचे अनेक प्रयत्‍न केले. इ.स. १९२४ मध्ये त्यांनी यासाठी तीन आठवड्यांचा उपवास केला. पण या प्रयत्‍नांना म्हणावे तितके यश मिळाले नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel