नल व दमयंती वेगळ्या मार्गाला लागलीं. नल आपल्याला एकटी सोडून गेला हे कळल्यावर, हिंम्मत न सोडतां, अरण्यांतून अनेकानेक संकटांना तोंड देत प्रवास करून दमयंती अखेर आपल्या पित्याच्या घरीं पोंचली. या सर्व संकट परंपरेचे मी वर्णन करीत नाहीं. मात्र हे सर्व होऊनहि दमयंतीचे नलावरचे प्रेम कणभरहि कमी झाले नाहीं! त्याचे काय झाले असेल व तो आपल्याला पुन्हा कसा भेटेल याचीच चिंता तिला लागून राहिली. इकडे नलाचीहि पाठ संकटांनी सोडली नाहीं. अर्ध्या वस्त्राने वनात फिरताना त्याला कर्कोटक नाग डसला व त्याचे सुंदर रूपच क्षणात नष्ट झाले. मात्र कर्कोटकाने त्याला म्हटलें ’ मी मुद्दामच असे केले कारण काही काळ तरी तुला विजनवासात काढावा लागणार आहे तर निदान तुझी ओळख कुणाला पटूं नये. योग्य वेळीं माझ्या कृपेने तुला तुझे मूळ रूप प्राप्त होईल.’ कर्कोटक नागाचा दंश हेहि माझ्या मते एक रूपकच आहे. खुद्द नलालाच आपण काळ अनुकूल येईपर्यंत अज्ञात रहाणे आवश्यक आहे हे लक्षात येऊन त्याने रूप व वेष पालटला असावा. (वनातील कर्कोटक नावाच्या नागकुळातील पुरुषाने त्याला साह्य केले.) तसे करून नलहि वनातून भटकत अखेर त्याच ऋतुपर्ण राजापर्यंत पोचला. त्याच्या दीर्घकाळच्या सारथ्याने, वार्ष्णेयाने, त्याला ओळखले नाही. स्वत: नलहि रथसंचालनाच्या कामात महान तज्ञ होता. त्याने ऋतुपर्णापाशीं सारथ्याची नोकरी धरली व तो व वार्ष्णेय दोघेहि जोडीने ते काम करत राहिले. नल अज्ञातवासात दु:खाने कालक्रमणा करीत होता व दमयंतीचे काय झाले असेल याची चिंता करत होता पण त्याला आशा वाटत होती कीं दमयंतीने हर प्रयत्नाने माहेर गाठले असेल. तसे झाले असेल तर ती आपल्या काळजीने चूर झाली असेल असेच त्याला वाटत होते. इकडे दमयंती पित्याच्या घरीं तुलनेने सुखात होती दोन्ही मुलेंहि तिच्या पाशीं सुखरूप होतीं पण नलाचे काय झालें असेल व पुन्हा त्याची भेट कशी होणार हा विचार तिला स्वस्थ बसूं देत नव्हता. तिने आपल्या परीने नलाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel