लिली व वालजी त्या भूत बंगल्यात राहात होती. मुंबईतील अगदी दूरच्या गरीब वस्तीत. तो प्रचंड बंगला होता. त्या बंगल्यात शेकडो खोल्या होत्या. त्या बंगल्यात भुते आहेत अशी आख्यायिका होती, म्हणून फारसे कोणी तेथे राहायला येत नसे. तेथे भाडे थोडे असे. बरेच गरीब लोक हळुहळू तेथे राहायला येऊ लागले. गरिबांना भुते थोडीच बाधा करणार? दारिद्रयाचे भूत ज्याच्या मानगुटीस बसलेले, त्याला बाकीचे भुते साधी वाटतात. बिर्‍हाडे बदलता बदलता वालजीही तेथे आला.

'लिल्ये, तू फार बाहेर जात जाऊ नकोस. घरातच खेळ. घरातच वाच हो.' वालजी म्हणाला.

'तुम्ही सांगाल तसं. तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर? मला निजवता, थोपटता. जणू मी कुकुलं बाळ!'

'तू का मोठी झालीस?'

'नाही का?'

'मग नको का थोपटत जाऊ?'

'थोपटा. तुमचा हात म्हणजे आईचा हात. माझ्या आईबापांचा हात मला आठवत नाही. तुमच्या हातात त्यांचं प्रेम आहे. आजोबा, तुम्हाला कोणी नाही?'

'आहे तर.'

'कोण आहे?'

'तू नाहीस का वेडे!'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel