“काही तरीच तुमचे बोलणे. तुमच्या इंदूला बावळट म्हटलेले तुम्हांला आवडेल का? सांगा.”

“नाही हों. आपला दिवाणखानाहि नीट लावून ठेव. तुझ्या हातांतसुद्धा कला आहे. तुझ्या डोळ्यांत कला आहे. कसे सारे नीटनेटके करतेस.”

“तुम्हा जा बाबा. मला काही सुचत नाही.”

“आजच सुचतनासे झाले?”

“हो आजच. तुम्ही फिरायला नाही जात?”

“अजून अवकाश आहे. तू नाही का येणार?”

“बघेन मी.”

मनोहरपंत आपल्या दिवाणखान्यांत गेले. कोणी मंडळी आली. त्यांच्याशी बोलणे सुरू झाले. येणा-या गुणाबद्दलच बोलणे होते. रमाबाईंनी चहा नेऊन दिला.

“आज इंदु कोठे आहे?”

“ती आज खोली साफसूफ करीत आहे. उद्यां पाहुणे येणार म्हणून सारे व्यवस्थिच करीत आहे.”

“खरे की काय?”

“अहो आमचे कधी ऐकेल तर शपथ. परंतु आज आले तिच्या मनांत.”

“ति-हाइतासामोर तरी फजिती नको असे वाटत असते.”

मनोहरपंत मंडळीबरोबर बाहेर पडले. इंदूला हाक मारायला ते विसरले का त्यांनी मुद्दमच हाक मारली नाही?

दुसरा दिवस उजाडला. इंदूची कोण धांदल.

“बाबा, आज चांगलीशी भाजी आणा.”

“कोणती आणूं?”

“आणा कोणती तरी. आणि मला फुले आणा हो. नाहीतर विसराल.”

“ते काही देशभक्त नाहीत इंदु. त्यांना माळ वगैरे नको हो घालायला.”

“पण मला हवीत केसांत घालायला.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel