अर्जुनाने द्रौपदीला दिलेले लग्नाचे वचन मोडले होते. याचे प्रायश्चित्त करण्यासाठी तो बारा वर्षांची परिक्रमा करण्यासाठी निघाला. अर्जुन उत्तर-पूर्व भारतात जाऊन पोहोचला. तेथे त्याची भेट नाग वंशीय विधवा उलूपी हिच्याशी झाली. अर्जुन उलुपीच्या प्रेमात पडला. त्यांनी नंतर विवाह केला. त्यांना तिथेच एक पुत्र झाला त्याचे नाव इरावन असे ठेवले. काही काळाने अर्जुन आपल्या यात्रेला निघून गेला. जाताना त्याने उलुपि आणि इरावानाला नागलोकात सोडले.महाभारतामध्ये भीष्म पर्वात इरावनाचा जन्म परदेशी झाला असा उल्लेख आहे. उलूपी  मूळची नागलोकातील होती. इरावनाचा जन्म हा नाग लोकाच्या बाहेरचा असल्याने तो परदेशी जन्माला असी नोंद आहे. इरावन आपल्या आईच्या घरी मोठा झाला होता. त्याचा मामा अर्जुनाचा नेहमीच दुस्वास करत करत होता. त्याने इरावनाचे मत अर्जुनाबद्द्ल कलुषित करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या आईने नेहमीच अर्जुनाबद्दल चांगलं सांगायची. नागलोकात इरावन आता युद्धकला शिकला होता.

अर्जुनाची दुविधा

एकीकडे हस्तिनापुरात दुर्योधन कृष्णाचे सारे सैन्य घेऊन तयारीत होता.तर दुसरीकडे पांडवांकडे मोजकेच मनुष्यबळ होते. मोजकेच युद्धवीर, पांडवांच्या प्रत्येक पत्नीच्या पिताचे सैन्य होते. भीमाची पत्नी हिडींबा हिचे काही दैत्यगण होते. एकदिवस कृष्ण आणि अर्जुन नदीकिनारी विहार करत असताना “पार्थ, तुझी नागवंशीय पत्नी उलूपी हिचा पुत्र इरावन आता युद्धात लढण्यायोग्य झाला असेल.” कृष्ण म्हणाला.  अर्जुनाने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पहिले. आपण उलुपीशी लग्न केले आहे हे कुणालाही कळू नये म्हणून त्याने त्यांना नागलोकात राहण्यास पाठवले होते. अर्जुन हे विसरला कि कृष्णापासून काहीही लपून राहू शकत नाही. तो त्रिकालदर्शी आहे. “मी त्यांना या युद्धाच्य ज्वाळेत झोकु इच्छित नाही कृष्णा” अर्जुन जरा दुःखी होऊन म्हणाला. “तू त्यांना या युद्धाच्या ज्वाळेत ढकलणारा कोण ? त्यांनी जेव्हा तुझ्याशी संबंध जोडले तेंव्हाच ते तुझ्या सर्व सुख दुखात सामील झाले. युद्धात आपल्या पित्याची मदत करणे हे इरावनाचे कर्तव्य आहे. तू त्याला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करू शकत नाहीस..!” कृष्णाने त्याला समजावले. अर्जुनला कृष्णाची गोष्ट पटली. त्याने कृष्ण आपल्या बरोबर नागलोकात येण्यास सांगितले.

इरावनाचा त्याग

              अर्जुन येणार हे उलुपीला कळले होते. तिने इरावनाला सांगितले, " पुत्र इरावन आज तुझे पिता अर्जुन आपल्या भेटीला येणार आहेत." इरावनाचा चेहरा खुलला,"आपण त्यांच्या घरी जाणार आहोत का माते?" उलुपी थोडी वरमली. इतकी वर्षे आपण भेटलो नाही आणि आता अचानक ते आपल्याला भेटायला येतायत. तिला याचे कारण समजुन घ्यायचे होते. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या येण्याची घोषणा झाली. इरावन खुश दिसत होता. अर्जुन आणि कृष्ण , उलुपीच्या कक्षात पोहोचले. इरावनाने दोघांना नमस्कार केला. अर्जुनाने त्याला आपल्या छातीशी लावले, " पुत्र इरावन, किती वर्षे तुला पाहिले नव्हते. खुप बरे वाटले आज तुला भेटुन." उलुपी हे पाहुन सद्गदित झाली. अर्जुन उलुपीकडे वळला आणि बोलु लागला, "मला तुझ्याकडुन एका उपकाराची अपेक्षा आहे.आता कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडवांनमध्ये युध्द होणार आहे. कौरवांकडे श्रीकृष्णाची सेना आहे परंतु आपल्याकडे फारच मोजके युद्धवीर आणि राजे आहेत. मी यथाशक्ती सर्व राजांना आणि राजपुत्रांना एकत्र करीत आहे. मला इरावनाची युध्दभुमीत आवश्यकता आहे. काही नागवंशीय जे स्वेच्छेने पांडवांबरोबर येऊ ईच्छितात त्यांचे मी स्वागतच करेन." उलुपीला एक क्षण नाकार द्यावासा वाटला परंतु एक नागवंशी राजकुमारी असल्याने तिला आपल्या कर्तव्यांची जाणीव होती. इरावनाला कृष्णाने जवळ बोलावले. "इरावना तुझ्यामध्ये नागवंशीयांची दैवी शक्ती आहे. तु काली मातेला प्रसन्न करु शकतोस. तुम्ही नागवंशीय नेहमीच तांत्रिक क्रियांतुन कार्यसिद्धी करु शकता." इरावनाला आपण आत्तापर्यंत शिकलेले सर्व विधी यथासांग माहीती होते. त्याने कृष्णाला अर्जुन विजयी व्हावा यासाठीच्या विधीची अनुमती मागितली. उलुपी त्याच्या मानातले जाणुन होती. इरावन स्वतःचे निर्णय स्वःत घेऊ शकत होता. त्याने विधीची तयारी केली. "आज येथे मी स्वःतच्या प्राणांची आहुती कालीमातेला देणार आहे.या विधीमुळे पिताश्रींचा युद्धात विजय अटळ आहे. माझी एक अट आहे. मी सारे जीवन जगलो परंतु गृहस्थीसुख अनुभवु शकलो नाही. मला या विधी आधी विवाहबंधन करायचे आहे." इरावनाची ही अट एेकुन सगळेच जरा अचंबीत वाटले. "जो जीव जन्मला त्याचा मृत्यु अटळ आहे परंतु त्या प्राण्याला आपले आयुष्य जगण्याचा हक्क आहे. त्यामुळे तुझी अट आम्हाला मान्य आहे" असे म्हणत कृष्णाने मोहिनी रुप धारण केले. इरावनाला गृहस्थीसुख मिळाले. त्याने कालीमातेच्या चरणी आपला जीव अर्पण केला. आपले कर्तव्य पार पाडले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel