वनवासाचीं बारा वर्षे पुरी होऊन पांडव अद्न्यातवासात गेल्यावर त्यांचा शोध करण्यासाठी कौरवांनी पुष्कळ हुशार माणसे सर्व दिशाना पाठवली होती. पांडवांचा शोध लागला असता तर द्यूताच्या अटीप्रमाणे त्याना पुन्हा बारा वर्षे वनवासाला जावे लागले असते! मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. कीचकाचा वध झाला त्यापाठोपाठच ते सेवक हस्तिनापुराला हात हलवीत परत आले होते. कीचकवध होऊन किती दिवस लोटले होते ते स्पष्ट सांगितलेले नाही. त्यामुळे भीमाने उल्लेखिलेल्या दीड महिन्याच्या काळापैकी किती दिवस शिल्लक होते? कौरवदरबारात भीष्मद्रोणांसमक्ष याची चर्चा झाली. ’अद्न्यातवासाचा थोडाच काळ शिल्लक उरला’ असे म्हटले गेले. मात्र २-३दिवस उरले असे कोणी म्हटले नाही. घबराट उडाली नाही. सेवकाना पुन्हा शोधासाठी पाठवले गेले. भीष्मानी त्याना खुलासेवार सूचना दिल्या व विषय संपला! त्रिगर्तांचा राजा सुशर्मा, दुर्योधनाचा मित्र, दरबारात उपस्थित होता त्याने कीचक मारला गेल्याच्या बातमीला दुजोरा देऊन सुचवले की राजा विराट आता दुर्बळ बनला आहे तेव्हा त्याचे गोधन लुटून आणण्याची संधी आली आहे. तेव्हा आपण दोन्ही दिशांनी हल्ला करावा. त्याची सूचना मान्य होऊन दुसऱ्याच दिवशी हल्ला करावयाचे ठरले. यावरून असे दिसते की कौरवाना अद्याप पांडवांच्या शोधाची निकड भासत नव्हती. अजून वेळ होता! भीष्मानेही पांडव सौरमानाने तेरा वर्षे पुरी करण्याची शक्यता विचारात घेऊन, त्याचे गणित करून, प्रकरण २-३ दिवसांवर आले आहे असे म्हटले नाही. चांद्रमानाने तेरा वर्षे, द्यूताच्या तिथि/मासाची तेरा आवर्तने, हीच मर्यादा सर्वांच्या नजरेसमोर होती असे स्पष्ट दिसते. विराटावरच्या स्वारीत भीष्म, द्रोण, अश्वत्थामा, कृप सारेच नि:शंकपणे सामील झाले. तेथे अर्जुनाशी लढावे लागणार आहे याची कोणी कल्पनाहि केली नव्हती!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel